Anjali Damania on Ajit Pawar's Sudden Death : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज, 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या धक्क्यातून सावरणे सर्वांनाच कठीण जात असताना, त्यांच्या राजकीय विरोधक अंजली दमानिया यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दमानिया म्हणाल्या की, "मी 2011 पासून त्यांच्याविरोधात अगदी टोकाची लढाई लढले आहे. अनेकदा जीव तोडून त्यांच्या धोरणांना विरोध केला, पण आज जे घडले ते अतिशय दुःखद आणि मनाला चटका लावणारे आहे. असा काही तरी दुर्दैवी प्रकार घडून त्यांचा अंत होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते."
राजकीय विरोध विरला, व्यक्त केली हळहळ
अजित पवार यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण पवार कुटुंब आणि त्यांचे लाखो समर्थक हादरले आहेत. पवार कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण काळात अंजली दमानिया यांनी पवार कुटुंबाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. "आजची घटना अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. या अघटित प्रसंगातून सावरण्यासाठी परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला शक्ती देवो, हीच माझी इच्छा आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला. राजकीय मतभेद बाजूला ठेवून एका नेत्याच्या अकाली जाण्याने सर्वच क्षेत्रांत हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - Ajit Pawar Death : अजितदादांच्या निधनाने क्रीडा विश्वही हळहळले ! सचिन तेंडुलकरसह दिग्गज क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली
दमानिया यांची अतिशय टोकाची आणि कायदेशीर लढाई
अंजली दमानिया यांनी 2011 पासून अजित पवार यांच्या विरोधात अतिशय टोकाची आणि कायदेशीर लढाई लढली होती. त्यांनी प्रामुख्याने सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांना लक्ष्य केले आणि त्यांच्या विरोधात भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचे नेतृत्व केले. याशिवाय, नुकताच काही आठवड्यांपूर्वी समोर आलेल्या पुण्यातील मुंढवा येथील जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात दमानिया यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर हल्ला चढवला होता. तसेच, याचा अजित पवार यांच्याशीही संबंध असल्याचा आरोप करत वारंवार राजीनाम्याची मागणी केली होती.
भीषण अपघात आणि बारामतीमध्ये शोककळा
अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे विशेष विमानाने निघाले होते. सकाळी 8:40 च्या सुमारास बारामती धावपट्टीवर लँडिंग करताना त्यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातात विमानाचा स्फोट झाला आणि त्यात अजित पवारांसह एकूण 6 जणांचा अंत झाला. या घटनेमुळे बारामती शहर आणि संपूर्ण तालुक्यात प्रचंड शांतता पसरली असून, अनेक कार्यकर्त्यांना आपले अश्रू अनावर झाले आहेत. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील एक दमदार आवाज कायमचा शांत झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एका युगाचा अंत झाला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्यभरात त्यांचे कार्यकर्ते आणि चाहते शोकाकुल आहेत.
हेही वाचा - Ajit Pawar Plane Crash : 'विमान ढगात गेलं अन् भीतीने पोटात गोळा आला'; अजितदादांनी सांगितला होता अंगावर काटा आणणारा 'तो' अनुभव