नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने तुर्की आणि अझरबैजानवर पूर्ण बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. एआयसीडब्ल्यूए म्हणते की या दोन्ही देशांचा दृष्टिकोन भारताविरुद्ध आहे. त्यामुळे आता आम्ही चित्रपटाशी संबंधित कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाही आणि प्रत्येक पावलावर सरकारसोबत उभे राहणार आहे. या निर्णयाचे वर्णन देशभक्ती आणि एकतेचे प्रतीक म्हणून करण्यात आले आहे.
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने सरकारकडे या देशांमधील सर्व कलाकारांचे व्हिसा रद्द करण्याची मागणीही केली आहे. भविष्यात व्हिसा देऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. AICWA ने बॉलिवूड आणि सर्व प्रादेशिक चित्रपट उद्योगांना आवाहन केले आहे की कोणताही कलाकार किंवा निर्मात्याने तुर्की आणि अझरबैजानमध्ये चित्रीकरणासाठी जाऊ नये. या देशांकडून प्रायोजित केलेल्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ नका. तुर्की आणि अझरबैजानमधील कलाकार किंवा वित्तपुरवठादारांसोबत कोणतेही प्रकल्प करू नका. तसेच AICWA ने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. तुर्की आणि अझरबैजानमधील सर्व कलाकारांचे व्हिसा तात्काळ रद्द करावेत अशी मागणी जयशंकर यांच्याकडे करण्यात आली आहे. भविष्यातही या देशांमधील कोणत्याही चित्रपट कलाकाराला व्हिसा देऊ नये असेही AICWA कडून सांगण्यात आले.
हेही वाचा : ....रक्ताळलेली गुणपत्रिका
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने स्पष्टपणे म्हटले आहे की जर कोणताही कलाकार किंवा निर्मात्याने या बहिष्काराचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्याला इंडस्ट्रीमध्ये निषेध आणि विरोधाला सामोरे जावे लागेल. AICWA ने भारतीय जनतेला या निर्णयाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. जे कलाकार या बहिष्काराकडे दुर्लक्ष करतील त्यांचे चित्रपट, गाणी किंवा कार्यक्रम लोकांनी पाहू नयेत असेही आवाहन AICWA केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'एक था टायगर', 'रेस 2', 'दिल धडकने दो', 'पठान', 'लाल सिंह चड्ढा' यांसारख्या अनेक चित्रपटांचे शूटिंग तुर्कीमध्ये झाले आहे.