Groom Refused Dowry : हुंडा प्रथेच्या विरोधात एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. एका सुशिक्षित नवरदेवाने आणि त्याच्या वडिलांनी समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. लग्नात हुंडा म्हणून समोर आलेले लाखो रुपये नाकारून या कुटुंबाने माणुसकी आणि स्त्री-सन्मानाचा मोठा संदेश दिला आहे. राजस्थानातून ही घटना समोर आली आहे. या विवाहामुळे राजस्थानमधील तरुणांमध्ये आणि सोशल मीडियावर सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी मिळवणं नव्हे, तर समाजातील चुकीच्या प्रथांना विरोध करणं होय, हे धीरेंद्र सिंह याने सिद्ध करून दाखवले आहे.
लग्नाच्या मांडवात हुंडा नाकारण्याचा निर्णय
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील बानसूर भागात असलेल्या बिलाली गावात ही घटना घडली. येथील रहिवासी जालिम सिंह यांचा मुलगा धीरेंद्र सिंह शेखावत याची वरात मंगळवारी, 10 फेब्रुवारी 2026 रोजी नागौर जिल्ह्यातील लुणसरा गावात पोहोचली होती. विशाखा राठोड आणि धीरेंद्र यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडत होता. लग्नाच्या धार्मिक विधींनंतर वधू पक्षाकडून प्रथेप्रमाणे 31 लाख रुपये रोख रक्कम हुंडा म्हणून नवरदेवाला देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र, हा प्रस्ताव पाहताच नवरदेवाने आणि त्याच्या वडिलांनी जे केले, त्याने सर्वांच्याच डोळ्यांत पाणी आले.
हेही वाचा - Ram Charan Baby Name: राम चरणने जपली परंपरा; मुलांची नावे वाचून तुम्हीही कौतुक कराल, नावामागचा तो खास अर्थ माहीत आहे का?
वडिलांनी जोडले हात: "लेकीपेक्षा मोठी संपत्ती नाही"
हुंड्याची रक्कम समोर येताच नवरदेवाचे वडील जालिम सिंह यांनी अत्यंत नम्रतेने ती स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी वधूच्या वडिलांना हात जोडून सांगितले की, "तुम्ही तुमची मुलगी आमच्या घरी सून म्हणून पाठवत आहात, हाच आमच्यासाठी सर्वात मोठा हुंडा आहे. लेकीपेक्षा कोणतीही संपत्ती किंवा धन-दौलत मोठी नसते." वडिलांच्या या निर्णयाला नवरदेव धीरेंद्रनेही पूर्ण पाठिंबा दिला. जालिम सिंह यांनी वधूपक्षाला संपूर्ण 31 लाख रुपयांची रक्कम सन्मानाने परत केली आणि केवळ एक नारळ आणि 1 रुपया स्वीकारून लग्नाचे विधी पूर्ण केले.
समाजाला मोठा संदेश; तरुणांमध्ये सकारात्मक चर्चेला सुरुवात
आजच्या काळात जिथे हुंड्यासाठी महिलांचा छळ आणि वादाच्या घटना सातत्याने घडतात, तिथे बिलाली गावातील या कुटुंबाने मांडलेला आदर्श ऐतिहासिक मानला जात आहे. "विवाह हा कोणताही आर्थिक व्यवहार नसून दोन जीवांचा आणि दोन कुटुंबांचा पवित्र बंध आहे," ही जालिम सिंह यांची भावना ऐकून लग्नातील पाहुणे आणि ग्रामस्थ भावूक झाले. अनेकांनी टाळ्या वाजवून या निर्णयाचे स्वागत केले. हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेला तिलांजली देण्यासाठी अशा धाडसी पावलांची समाजाला नितांत गरज असल्याचे मत यावेळी ज्येष्ठांनी व्यक्त केले. जर प्रत्येक नवरदेवाने असा ठाम निर्णय घेतला, तर समाजातील हुंड्याची कीड कायमची नष्ट होऊ शकते, असा विश्वास आता व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा - Gold Biscuits: नवरीच्या भावाचा 'रॉयल' स्वॅग! लग्नात आलेल्या पाहुण्यांना वाटली चक्क सोन्याची बिस्किटे; पाहा व्हायरल व्हिडिओ