Bihar Assembly Election 2025 First Phase Voting : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज (गुरुवार, 6 नोव्हेंबर 2025) सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झाले. या टप्प्यात 121 विधानसभा जागांवर मतदान होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 60 टक्के मतदान झाले असून, ही टक्केवारी गेल्या निवडणुकीतील 55 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यंदाच्या टक्केवारीमुळे मतदानाचा मागच्या वेळचा रेकॉर्ड मोडला गेला आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि मंत्री विजय कुमार सिन्हा यांच्यासह बिहार सरकारच्या 14 मंत्र्यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे.
पंतप्रधान मोदींचे आवाहन आणि मतदार यादीतील गोंधळ
या मतदानाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करून मतदारांना आवाहन केले होते की, "आधी मतदान करा आणि नंतर नाश्ता करा." विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही लोकशाही, संविधान आणि मानवतेसाठी मतदान करण्याचे आवाहन केले.
मतदारांचा दावा
दरम्यान, दोन महिलांनी त्यांना मतदान करू दिले नाही, असा दावा केला आहे. श्रेया मेहता आणि अनुपमा शर्मा नावाच्या महिलांनी सांगितले की, त्यांचे नाव मतदार यादीत (Voter List) असूनही, त्यांच्याकडे स्लिप नसल्यामुळे मतदान अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवले. "आम्ही आता परत जात आहोत, आम्ही मतदान करणार नाही," असेही श्रेया मेहता यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले.
हेही वाचा - Vijay Sinha Attack: लखीसरायमध्ये उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांच्या ताफ्यावर हल्ला; राजद कार्यकर्त्यांवर गुंडगिरीचा आरोप
उपमुख्यामंत्र्यांच्या वाहनावर हल्ला आणि नक्षलग्रस्त भागात मतदान
पहिल्या टप्प्यात मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी तणाव दिसून आला. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लखीसराय येथील भाजप उमेदवार विजय कुमार सिन्हा यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची घटना घडली.
यावर प्रतिक्रिया देताना विजय सिन्हा म्हणाले की, "हे राजदचे गुंड आहेत. एनडीए सत्तेत आल्यावर त्यांच्या छातीवर बुलडोझर चालवला जाईल. गुंडांनी माझ्या मतदान एजंटला हाकलून लावले आणि त्याला मतदान करण्यापासून रोखले."
याचदरम्यान, एक सकारात्मक गोष्ट घडली आहे, ती म्हणजे बिहारमधील नक्षलग्रस्त भीमबांध परिसरात 20 वर्षांत पहिल्यांदाच मतदान होत आहे. सरकारने मतदारांना कोणत्याही भीतीशिवाय मुक्तपणे मतदान करता येईल, असे आश्वासन दिले होते. दुपारी 3 वाजेपर्यंत 53.77 टक्के मतदान झाले होते, ज्यात गोपाळगंज जिल्ह्यात सर्वाधिक 46.73 टक्के मतदान झाले होते.
हेही वाचा - Bhushan Gavai: 'न्यायाचे मंदिर असावे, 7 स्टार हॉटेल नव्हे'; मुंबई हायकोर्ट इमारतीबाबत सीजेआय गवई यांचा स्पष्ट संदेश