वसई : मतदानाच्या दिवशी दिवंगत सुनंदा शिवराम चव्हाण यांच्या स्मृतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन वसई पश्चिम येथील साईधाम मंदिर, विद्यामंदिर मार्ग येथे आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात बहुसंख्य मतदार यांनी मतदान झाल्यावर रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडले.
निवडणुकीच्या धामधुमीत रक्तदान शिबिर न झाल्याने रक्तसाठा कमी झाला होता. गरजू रुग्णांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत होते. या परिस्थिचा अंदाज आल्यावर मतदानाच्या दिवशीच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. वसईकरांनी मतदान आणि रक्तदान या दोन्ही उपक्रमांना उत्साहवर्धक प्रतिसाद दिला.
लोकशाही संवर्धन करण्यासाठी जसे मतदान आवश्यक आहे तसे रुग्णांच्या संवर्धनासाठी रक्तदान आवश्यक असल्याचे आयोजक मिलिंद चव्हाण यांनी सांगितले. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी छोटू आनंद, उमेश शिखरे, सुशांत धुळप, मूतूजा मिठाईवाला, हरीश बिष्ट, विकास दुबे, अली असगर यांनी विशेष सहकार्य केले.