Chandrashekhar Bawankule on Mukhyamantri Baliraja Yojna : महाराष्ट्राचे राजकारण सध्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका विधानाची चर्चा सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी सरकारी नोकरीच्या मागे न लागता शेतीमध्येच आपले भविष्य घडवावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. बावनकुळे यांच्या मते, जर शेतकऱ्याच्या शेतापर्यंत वीज, पाणी आणि रस्ता या मूलभूत सुविधा पोहोचल्या, तर तो तरुण नोकरीची मागणी करणार नाही. शेतीमध्येच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुप्पट-तिप्पट उत्पन्न मिळवण्याची क्षमता ग्रामीण तरुणांमध्ये असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. हवेली येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी या संकल्पनेवर भर दिला.
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेचा शुभारंभ
यावेळी बावनकुळे यांनी 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते' योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. या ऐतिहासिक योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पक्के रस्ते उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून, यामुळे शेतमालाची वाहतूक सुलभ होणार आहे. हा निर्णय केवळ एका तालुक्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्राला लागू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - Monsoon 2026 : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस! भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता वाढली
शेतीमध्येच दडलीय प्रगतीची संधी
बावनकुळे यांनी आपल्या भाषणात शेतीमधील आर्थिक समृद्धीवर विशेष प्रकाश टाकला. मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्याने आजचा तरुण शहराकडे धाव घेत आहे, मात्र रस्ते आणि विजेचा प्रश्न सुटल्यास शेती हा अत्यंत फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो. सरकारी नोकरीपेक्षा शेतीतून अधिक उत्पन्न मिळवणे शक्य असल्याचे सांगत त्यांनी ग्रामीण भागातील तरुणांना प्रोत्साहन दिले. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन देत, त्यांनी भविष्यातील कृषी क्रांतीचे सूतोवाच केले.