मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला. या बैठकीत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी 100 दिवसांत प्राधान्याने केली जाणारी कामे निश्चित केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, प्रत्येक कार्यालयाच्या वेबसाईटला सुसज्ज करणे आवश्यक आहे, तसेच ती सायबरदृष्ट्या सुरक्षित ठेवावी. माहिती अधिकाराअंतर्गत मागितली जाणारी सर्व माहिती संकेतस्थळावर आधीच ठेवली पाहिजे. याशिवाय, कार्यालयांची स्वच्छता आणि अनावश्यक कागदांचा निचरा करण्याचे निर्देशही देण्यात आले. पिण्याचे पाणी, सार्वजनिक प्रसाधनगृह स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष लक्ष द्यावे.
हे ही वाचा : 'नव्या विषाणूबाबत भीती बाळगू नका'
मुख्यमंत्र्यांनी इज ऑफ लिव्हिंग आणि इज ऑफ वर्किंगला प्राधान्य देताना, प्रत्येक कार्यालयात किमान दोन सुधारणा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे सांगितले. ते म्हणाले, "पेंडिंग कामे शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करा, आणि सामान्य माणूस कोणत्या वेळेला भेटीला येऊ शकतो, याची माहिती पाटीवर नमूद करा."
मुख्यमंत्र्यांनी यावेळी लोकशाही दिनसारखे उपक्रम राबवण्याची आवश्यकता सांगितली. गुंतवणूक आकर्षित करत असताना, लोकांना त्रास न देण्याचे सुनिश्चित करणे, यावरही त्यांनी भर दिला. फ्लॅगशिप कार्यक्रम, शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या जात असल्याची खात्री घेतली पाहिजे, असेही त्यांनी निर्देश दिले.मुख्यमंत्र्यांचे निर्देश यासाठी पालक सचिवांनी लक्ष देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
क्लिक करा. - जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.