Dadar-Bhusawal Train : खान्देशातील प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला असून, दादर-भुसावळ विशेष एक्स्प्रेसला आता कायमस्वरूपी दर्जा देण्यात आला आहे. जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली. आतापर्यंत ही गाडी केवळ विशेष रेल्वे म्हणून मुदतवाढीवर चालवली जात होती. परंतु, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद आणि सातत्यपूर्ण मागणी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने ही सेवा नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या क्रमांकासह नियमित सेवा
या निर्णयामुळे आता ही रेल्वे 'विशेष' (Special) ऐवजी नियमित गाडी म्हणून ओळखली जाईल. ही गाडी आता 19047 आणि 19048 या नवीन क्रमांकांसह धावणार आहे. ही रेल्वे सेवा सोमवार, बुधवार आणि शनिवारी असे आठवड्यातून तीन दिवस उपलब्ध असेल. मुंबई (दादर) ते भुसावळ दरम्यानची कनेक्टिव्हिटी यामुळे अधिक मजबूत होणार असून, खान्देशातील नोकरदार, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना मुंबईला ये-जा करणे अधिक सुलभ होणार आहे.
हेही वाचा - Expressway Traffic Jam : मुंबई-पुणे आणि मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण वाहतूक कोंडी; हजारो प्रवासी तासनतास अडकले
प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा
रेल्वेला कायमस्वरूपी दर्जा मिळाल्याचा सर्वात मोठा फायदा प्रवाशांच्या खिशाला होणार आहे. विशेष रेल्वेचे तिकीट दर सामान्य गाड्यांच्या तुलनेत जास्त असतात, मात्र आता ही गाडी नियमित झाल्यामुळे तिकीट दरात सुमारे 20 ते 25 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. यामुळे सामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक किफायतशीर होईल. विशेषतः उपचारांसाठी मुंबईला जाणाऱ्या रुग्णांना आणि रोजगारासाठी प्रवास करणाऱ्यांना या स्वस्त प्रवासाचा मोठा लाभ मिळेल.
रेल्वे मंत्र्यांचे मानले आभार
खान्देशच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीला नवी गती देणाऱ्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. खासदार स्मिता वाघ यांनी खान्देशवासीयांच्या दीर्घकालीन मागणीला न्याय मिळाल्याचे सांगत समाधान व्यक्त केले आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल खान्देशातील नागरिकांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. भविष्यात या गाडीच्या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ करण्याबाबतही रेल्वे प्रशासन विचार करत असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हेही वाचा - Santosh Deshmukh Case : दिवंगत संतोष देशमुखांच्या फोटोसोबत कोरली सत्य-विरा-युद्ध नावं; धनंजय देशमुखांनी टॅटू रुपात जपली भावाची आठवण