आसाम: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर आसाम राज्यात मोठी कारवाई सुरू झाली आहे. सोशल मीडियावर भडकावू आणि आपत्तिजनक पोस्ट करणाऱ्यांवर कठोर पावले उचलत आसाम पोलिसांनी मागील काही तासांत एकूण 15 जणांना अटक केली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी याबाबत माहिती देत सांगितले की दिल्ली स्फोटांनंतर सोशल मीडियावर केलेल्या अशा पोस्टच्या संदर्भात राज्यभरातून अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितले की बुधवारपर्यंत 6 जणांना अटक झाली होती, तर रात्रीपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आणखी 9 जणांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी सांगितले की हे सर्व आरोपी सोशल मीडियावर स्फोटाची थट्टा करत होते, तसेच हिंसा पसरवणारे मजकूर पोस्ट करत होते. रात्री अटक करण्यात आलेल्या 9 जणांची ओळखही पोलिसांनी जाहीर केली आहे. त्यात बोंगाईगावचा रफीजुल अली, हैलाकांडी येथील फोरिद उद्दीन लस्कर, लखीमपूरचा इनामुल इस्लाम आणि फिरुज अहमद उर्फ पोपन यांचा समावेश आहे. बारपेटा जिल्ह्यातील शाहिल शोमन सिकदर आणि रकीबुल सुलतान, होजाईचा नसीम अकरम, कामरूप जिल्ह्याचा तस्लीम अहमद आणि दक्षिण सलमारा येथील अब्दुर रोहिम उर्फ बप्पी हुसैन यांना पकडण्यात आले.
हेही वाचा: Money Laundering Case: ED ची मोठी कारवाई; मनी लाँड्रिंग प्रकरणात JP इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक
या कारवाईपूर्वीही आसाम पोलिसांनी 5 जणांना अटक केली होती. दरांग जिल्ह्यातील मतीउर रहमान, गोलपाडा येथील हसम अली, चिरांगचा अब्दुल लतीफ, कामरूपचा वझुल कमाल आणि बोंगाईगावचा नूर अमीन अहमद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या सर्वांवरही दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर भडकावू आणि आपत्तिजनक पोस्ट केल्याचा आरोप आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्पष्ट केले की आसाम पोलिस हिंसेचे समर्थन करणाऱ्यांविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका घेत आहेत. त्यांनी चेतावणी दिली की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून द्वेष पसरवणारे, हिंसा भडकवणारे किंवा दहशतवादाचे समर्थन करणारे कोणतेही व्यक्ती असतील, तर त्यांच्यावर कडक कारवाई सुरू राहील.
सरमा यांनी पुढे सांगितले की दिल्लीतील स्फोटाची बातमी समोर आल्यानंतर काही व्यक्तींनी सोशल मीडियावर हसणारे इमोजी टाकत स्फोटाची खिल्ली उडवली. त्यांनी अशा लोकांना ‘दहशतवादी समर्थक’ म्हटले असून पोलिस त्यांना पकडण्यासाठी सततच्या मोहिमेत व्यस्त असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी म्हटले की अशा प्रकारच्या पोस्ट समाजात तणाव निर्माण करतात आणि त्यामुळे कठोर कारवाई अनिवार्य आहे.
हेही वाचा: HC Slams State Govt: मेळघाटमध्ये कुपोषणाने 65 बालकांचे मृत्यू; मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारची खरडपट्टी