Sunday, March 08, 2026 01:44:50 PM

Narasimha Dwadashi 2026 : भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी स्तंभातून प्रकटले भगवान नरसिंह; ही कथा वाचल्याने भीती आणि संकटे पळतील दूर

नरसिंह द्वादशीदिवशी व्रत केल्याने आणि भक्त प्रल्हादाची कथा ऐकल्याने सर्व पापांतून मुक्ती मिळते आणि भक्तांच्या जीवनातील भीती व संकटे दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

narasimha dwadashi 2026  भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी स्तंभातून प्रकटले भगवान नरसिंह ही कथा वाचल्याने भीती आणि संकटे पळतील दूर

Narasimha Dwadashi Vrat Katha : हिंदू धर्मात नरसिंह द्वादशीला विशेष महत्त्व असून हा दिवस भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या नरसिंह देवाला समर्पित आहे. यंदा ही पावन तिथी 27 फेब्रुवारी 2026 च्या रात्री 10 वाजून 32 मिनिटांनी सुरू  होईल आणि दुसऱ्या दिवशी 28 फेब्रुवारी 2026 च्या रात्री 08 वाजून 43 मिनिटांनी संपेल. या दिवशी व्रत केल्याने आणि भक्त प्रल्हादाची कथा ऐकल्याने सर्व पापांतून मुक्ती मिळते आणि भक्तांच्या जीवनातील भीती व संकटे दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

असुरराज हिरण्यकश्यपूचा अहंकार आणि वरदान
पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी महर्षी कश्यप आणि दिती यांना हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू (हिरण्यकशिपु) नावाचे दोन पुत्र होते. जेव्हा भगवान विष्णूंनी वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाचा वध केला, तेव्हा हिरण्यकश्यपू सूडाने पेटून उठला आणि त्याने विष्णूंना आपला शत्रू मानले. त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपस्या करून एक अजब वरदान मिळवले. या वरदानानुसार, त्याला कोणताही मनुष्य किंवा प्राणी मारू शकणार नव्हता; त्याचा मृत्यू ना दिवसा होणार होता ना रात्री; ना पृथ्वीवर, ना आकाशात; ना घराच्या आत ना बाहेर; आणि ना कोणत्याही अस्त्राने ना शस्त्राने. या वरदानामुळे तो स्वतःला अमर मानू लागला आणि त्याने तिन्ही लोकांवर अत्याचार सुरू केले.

भक्त प्रल्हादाचा अढळ विश्वास आणि सख्ख्या पित्याकडून छळ
हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद हा त्याची आई कयाधू हिच्याकडून मिळालेल्या संस्कारांमुळे बालपणापासूनच भगवान विष्णूंचा परम भक्त होता आणि अखंड 'नारायण, नारायण' जप करत असे. आपल्याच घरात आपला शत्रू पूजला जातोय हे पाहून हिरण्यकश्यपू संतापला. त्याने प्रल्हादाला विष्णू भक्तीपासून परावृत्त करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, त्याला डोंगरावरून फेकून दिले, विष दिले आणि आपली बहीण होलिका हिच्या मदतीने अग्नीत जाळण्याचाही प्रयत्न केला. मात्र, 'नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करणाऱ्या प्रल्हादाला अग्नी स्पर्शही करू शकला नाही आणि होलिका स्वतः जळून खाक झाली.

हेही वाचा - Karmayoga: सूडाच्या आगीत स्वतःला जाळू नका! श्रीकृष्णाचा कर्माचा सिद्धांत आणि काळ करेल प्रत्येक अन्यायाचा हिशोब, फक्त विश्वास ठेवा

स्तंभातून प्रकटले भगवान नरसिंह
शेवटी संतापलेल्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला एका स्तंभाला (खांबाला) बांधले आणि विचारले, "जर तुझा नारायण विष्णू सर्वत्र आहे, तर तो या खांबात आहे का?" प्रल्हादाने अत्यंत शांतपणे 'हो' असे उत्तर दिले. हिरण्यकश्यपूने रागाने गदेने खांबावर प्रहार केला. त्याच क्षणी खांब फोडून त्यातून अर्धे शरीर मनुष्याचे आणि अर्धे सिंहाचे असलेले 'भगवान नरसिंह' प्रकट झाले. प्रल्हादाच्या रक्षणासाठी देवाने धारण केलेले हे रूप अत्यंत उग्र आणि दिव्य होते.

अहंकाराचा अंत आणि धर्माचा विजय
भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपूला उचलून राजवाड्याच्या उंबरठ्यावर आणले (जे ना घराच्या आत होते ना बाहेर). वेळ संध्याकाळची होती (जी ना दिवस होती ना रात्र). भगवंताने त्याला आपल्या मांड्यांवर झोपवले (जी ना पृथ्वी होती, ना आकाश होते) आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी (जे ना अस्त्र होते ना शस्त्र) त्याचे पोट फाडून वध केला. अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या वरदानाचा मान राखून भगवान श्रीविष्णूंनी अधर्माचा नाश केला. नरसिंह द्वादशीच्या दिवशी या कथेचे पठण केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि सुख-समृद्धीचा मार्ग मोकळा होतो, अशी भक्तांची धारणा आहे.

हेही वाचा - Holi Dhulivandan 2026 Date: यंदाच्या होळीवर चंद्रग्रहणाचे सावट.. होळी 2 की 3 मार्चला? लगेच दूर होईल तारखेचा संभ्रम

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री