मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या कार्यकाळात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी डीडी सह्याद्रीला दिलेल्या मुलाखतीत महायुती सरकारच्या आगामी पाच वर्षांचा विकास आराखडा सांगितला. यामध्ये नदीजोड प्रकल्प आणि ग्रीन एनर्जीवर विशेष भर दिला.
फडणवीस म्हणाले, "कालच्या शपथविधीतील जनसमुदाय पाहिला तर खूप आनंद झाला. जे यश जनतेने दिलं आहे, ते सेलिब्रेशन करण्याकरिता नाही, तर ते यश जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरिता दिलं आहे. मला खूप मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली आहे."
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, "नव्या कार्यकाळात आम्ही प्रकल्पांना वेगाने पुढे नेणार आहोत. नदीजोड प्रकल्प हा माझा प्राथमिक लक्ष असेल. यामुळे महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल."
फडणवीसांनी ग्रीन एनर्जीविषयीही आपली भूमिका स्पष्ट केली. "आम्ही 54,000 मेगावॅटचे वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत आणि 2030 पर्यंत 52 टक्के वीज ग्रीन एनर्जीसारख्या पारंपारिक स्त्रोतांद्वारे मिळवू," असे ते म्हणाले. यामुळे राज्यातील शेती आणि उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होईल, तसेच रोजगारनिर्मिती आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतील विकासकामांविषयीही माहिती दिली. "२०१६ मध्ये मी एक घोषणा केली होती की, मुंबईच्या एमएमआर रिजनमधील कोणत्याही भागात एक तासात जाता आलं पाहिजे. पण आम्ही त्याच्यापुढे जात आहोत. कोस्टल रोड, वर्सोवा सी-लिंक, मढपासून विरारपर्यंत सिलिंक आणि 375 किलोमीटर मेट्रो नेटवर्क हे सर्व प्रकल्प पूर्ण होत आहेत," असे फडणवीस म्हणाले. मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि मुंबईकरांच्या वेळेची बचत करण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.