Sunday, March 08, 2026 01:24:46 PM

Property Act : आजोबांच्या संपत्तीत नातवंडांना वाटा मिळतो का? 'हिंदू वारसा कायदा'मध्ये नेमक्या काय आहेत तरतुदी...

अनेकांचा असा समज आहे की, आईचा मृत्यू झाला की तिचा माहेरच्या संपत्तीतील अधिकार संपतो, मात्र हे चुकीचे आहे. नातेसंबंधांतील कटुता टाळण्यासाठी संपत्तीविषयीचे काही नियम माहीत असणे आवश्यक आहे.

property act  आजोबांच्या संपत्तीत नातवंडांना वाटा मिळतो का हिंदू वारसा कायदामध्ये नेमक्या काय आहेत तरतुदी

Property Rights : मालमत्ता आणि वारसाहक्क हा विषय जितका महत्त्वाचा आहे, तितकाच तो गुंतागुंतीचाही असू शकतो. विशेषतः 'आजोबांच्या संपत्तीत नातवंडांचा कायदेशीर अधिकार असतो का?' हा प्रश्न अनेकांना संभ्रमात टाकतो. 'हिंदू वारसा कायदा 1956' आणि त्यातील 2005 ची दुरुस्ती या संदर्भात अत्यंत स्पष्ट तरतुदी करते. आईच्या मृत्यूनंतर तिचे हक्क संपुष्टात येत नाहीत, तर ते तिच्या मुलांकडे हस्तांतरित होतात.

आईचा हक्क आणि 'प्रथम श्रेणी' वारसदार
हिंदू वारसा कायद्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू मृत्युपत्र (Will) न करता झाला, तर त्याची मालमत्ता 'प्रथम श्रेणी' (Class 1) वारसदारांमध्ये समान प्रमाणात विभागली जाते. यामध्ये मृत व्यक्तीची पत्नी, मुले आणि मुली यांचा समावेश होतो. समजा, एका व्यक्तीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, तर दोघांनाही वडिलांच्या संपत्तीत प्रत्येकी 50 टक्के वाटा मिळतो. मुलीचे लग्न झाले असले तरी तिचा हा कायदेशीर हक्क अबाधित राहतो.

आईच्या मृत्यूनंतर नातवंडांची भूमिका
अनेकांचा असा समज आहे की, आईचा मृत्यू झाला की तिचा माहेरच्या संपत्तीतील अधिकार संपतो, मात्र हे चुकीचे आहे. कायद्यानुसार, आईच्या मृत्यूनंतर, तिला जो हिस्सा मिळणार होता, तो रद्द होत नाही.
आईची जागा तिच्या पश्चात तिचे कायदेशीर वारसदार म्हणजे तिची मुले (नातवंडे) आणि तिचा पती घेतात.
आजोबांच्या संपत्तीत आईचा जो 1/3 किंवा 1/2 वाटा होता (भावंडांच्या संख्येनुसार), त्यावर आता तिच्या मुलांचा पूर्ण कायदेशीर अधिकार असतो.

हेही वाचा - Property Rights : वडिलांच्या मृत्यूनंतर मालमत्तेवर हक्क कोणाचा? मृत्यूपत्राशिवाय होणाऱ्या वाटणीचे कायदेशीर नियम जाणून घ्या

दानपत्र (Gift Deed) आणि त्यातून निर्माण होणारे कायदेशीर अडथळे
काही कुटुंबांमध्ये आईच्या मृत्यूनंतर आजोबा (हयात असल्यास) किंवा इतर वारस (उदा. मामा) संपूर्ण संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न करतात. कधीकधी आजी भावनेच्या भरात संपूर्ण मालमत्ता 'दानपत्रा'च्या माध्यमातून स्वतःच्या मुलाच्या नावावर करते. परंतु, कोणतीही व्यक्ती केवळ स्वतःच्या हिश्शाचीच मालमत्ता दुसऱ्याला दान करू शकतो. जर मृत मुलीचा (आईचा) हिस्सा परस्पर दुसऱ्याच्या नावावर केला असेल, तर ते कायदेशीरदृष्ट्या चुकीचे ठरते. अशा परिस्थितीत नातवंडे त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागू शकतात.

महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे:
- 2005 ची दुरुस्ती: या दुरुस्तीनंतर मुलींना वडिलांच्या संपत्तीत मुलांप्रमाणेच जन्मतः समान अधिकार प्राप्त झाले आहेत.

- वैयक्तिक मालमत्ता: वडिलांकडून मिळालेली संपत्ती ही वारसदाराची वैयक्तिक मालमत्ता मानली जाते. त्यावर इतर कोणाचा अधिकार नसतो. तसेच, पुरुषाच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीवर मुले किंवा विधवा पत्नी यांचा एकाधिकार नसतो.

- वडिलोपार्जित संपत्ती: जरी मालमत्ता वडीलोपार्जित असली, तरी मुलगा आणि मुलगी दोघांनाही त्यात समान वाटा आहे.

- वडिलांची स्वकष्टार्जित मालमत्ता: या मालमत्तेची वडील स्वतःच्या हयातीत स्वेच्छेनुसार पत्नी आणि मुलांमध्ये विभागणी करू शकतात. तसेच, त्यांच्या पश्चात कशा प्रकारे ही विभागणी केली जाऊ शकते, याबाबत मृत्यूपत्र तयार करून ठेवू शकतात. यानुसारच, त्यांच्या मुला-मुलींचा आणि त्यांच्यानंतर त्यावर नातवंडांचा अधिकार लागू होतो.

- केवळ सरकारी कागदपत्रांवर किंवा सातबारावर तुमचे नाव नाही म्हणजे तुमचा हक्क संपला असे होत नाही. आईच्या वाट्याची संपत्ती मिळवणे हा नातवंडांचा जन्मसिद्ध आणि कायदेशीर अधिकार आहे.

हेही वाचा - New Tax Rule 2026: 1 एप्रिलपासून बदलणार टॅक्सचे नियम; वाहन खरेदी, प्रॉपर्टी डील आणि रोख व्यवहारांवर सरकारची करडी नजर


सम्बन्धित सामग्री