Hardik Pandya Video Viral: हार्दिक पंड्या आणि मुरली कार्तिक यांच्यात भर मैदानात शाब्दिक चकमक झाल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी रायपूरच्या मैदानावर हा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या आणि माजी भारतीय फिरकीपटू तथा समालोचक मुरली कार्तिक यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. सरावासाठी मैदानात उतरलेल्या हार्दिकचा चेहरा रागाने लाल झाला होता. सुरुवातीला दोघांमध्ये संवाद सुरू झाला, मात्र काही वेळातच त्याचे रूपांतर वादात झाले. हार्दिकने रागाच्या भरात मुरली कार्तिक यांच्याकडे बोट दाखवून आपली नाराजी व्यक्त केली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वादाचे नेमके कारण काय?
हा वाद नेमका कशामुळे झाला, याचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरली कार्तिक यांनी यापूर्वी हार्दिकच्या मैदानातील निर्णयांवर केलेल्या टीकेमुळे हार्दिक नाराज होता. व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसते की, हार्दिक बोलता बोलता पुढे निघून जातो, पण कार्तिक पुन्हा त्यांच्याजवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न करतात. हार्दिकचे देहबोलीवरून (Body Language) तो रागावला असल्याचे स्पष्ट जाणवत होते. हा व्हिडिओ स्टँडमधून एका चाहत्याने चित्रित केला असून, त्यात ऑडिओ नसल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
रायपूरमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय
मैदानाबाहेरील या वादळाचा परिणाम भारताच्या खेळावर झाला नाही. रायपूरमधील या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडने दिलेल्या 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी केवळ 15.2 षटकात विजय मिळवून दिला. भारताने आता मालिकेत 2−0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे. या विजयामुळे भारताने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
हेही वाचा - ICC T20 World Cup 2026 : बांगलादेश अधिकृतपणे T20 विश्वचषकातून बाहेर; जय शाह यांच्या नेतृत्वाखाली ICC चा मोठा निर्णय
सूर्या आणि इशान किशनचा धुमाकूळ
भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले कर्णधार सूर्यकुमार यादव आणि सलामीवीर इशान किशन. इशान किशनने अवघ्या 21 चेंडूत अर्धशतक झळकावून न्यूझीलंडविरुद्ध सर्वात वेगवान टी-20 अर्धशतक करण्याचा विक्रम केला. त्याने 32 चेंडूत 76 धावांची वादळी खेळी केली. तर दुसरीकडे, कर्णधार सूर्याने 37 चेंडूत नाबाद 82 धावा ठोकून आपल्या जुन्या लयीत परतल्याचे संकेत दिले. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी करून सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकवला. हार्दिक पंड्याला या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही, परंतु त्याने गोलंदाजीत 1 बळी घेतला.
माजी खेळाडूच्या टीकेला मैदानात उत्तर?
मुरली कार्तिक यांनी यापूर्वी हार्दिकच्या कॅप्टन्सीवर आणि डेथ ओव्हर्समध्ये स्वतः गोलंदाजी न करण्याच्या निर्णयावर कडक शब्दांत टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर हार्दिकची ही कृती म्हणजे त्या टीकेला दिलेले उत्तर असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विश्वचषक 2026 च्या पार्श्वभूमीवर हार्दिकचे संघात झालेले पुनरागमन महत्त्वाचे मानले जात आहे. आता या वादानंतर पुढील सामन्यात हार्दिक कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. या मालिकेतील तिसरा सामना रविवारी गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे.
हेही वाचा - Palash Muchhal Controversy: ‘दुसऱ्या महिलेसोबत बेडवर रंगेहात पकडलं…’ गंभीर आरोपांवर पलाशने अखेर मौन सोडलं, म्हणाला ‘मी चुकीचं…’