Thursday, March 12, 2026 10:30:08 PM

IND vs PAK : भारताचा पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक विक्रम! टी-20 विश्वचषकात नोंदवली आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या

कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या 27 व्या सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी मोठं आव्हान दिलं आहे.

ind vs pak  भारताचा पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक विक्रम टी-20 विश्वचषकात नोंदवली आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या

IND vs PAK : टी-20 विश्वचषक 2026 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने फलंदाजीमध्ये नवा इतिहास रचला आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या 27 व्या सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 176 धावांचे तगडे आव्हान ठेवले आहे. निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून भारताने 175 धावा केल्या असून, टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धची ही भारताची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.

शेवटच्या षटकात शाहीन आफ्रिदीचा धुव्वा
डावाच्या शेवटच्या षटकात भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांवर अक्षरशः हल्ला चढवला. शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या शाहीन आफ्रिदीला रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनी फोडून काढत 16 धावा वसूल केल्या. रिंकू सिंगने अवघ्या 4 चेंडूत 11 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, ज्यात एक आकर्षक चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तर शिवम दुबेनेही एक मोक्याचा चौकार मारत संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

रोमांचक शेवट आणि धावबादचा थरार
डावाच्या शेवटच्या काही चेंडूंवर कमालीचा थरार पाहायला मिळाला. शेवटच्या दोन चेंडूंवर धावा घेण्याच्या प्रयत्नात शिवम दुबे धावबाद झाला, त्यापाठोपाठ अक्षर पटेलही बाद झाला. मात्र, या धावपळीत भारताने 175 धावांचा आकडा गाठला. यामुळे पाकिस्तानला आता इतिहास रचण्यासाठी 176 धावांचे लक्ष्य गाठावे लागणार आहे. टी-20 विश्वचषकाच्या दबावाखाली या लक्ष्याचा पाठलाग करणे पाकिस्तानच्या फलंदाजीसाठी अजिबात सोपे नसेल.

हेही वाचा - IND vs PAK : अभिषेक शर्माचा 'फ्लॉप शो'; भारत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद

भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष
आता सर्वांचे लक्ष भारतीय गोलंदाजांकडे लागले आहे. पाकिस्तानला हा सामना जिंकायचा असेल, तर त्यांना टी-20 विश्वचषकातील त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद करावी लागेल. दुसरीकडे, भारताकडे जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांसारखे जागतिक दर्जाचे गोलंदाज असल्याने, 176 धावांचे संरक्षण करण्यासाठी टीम इंडियाचे पारडे जड मानले जात आहे.


सम्बन्धित सामग्री