Basmati Rice Export : इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा भडका आता भारताच्या कृषी व्यापारापर्यंत पोहोचला आहे. होर्मुजची सामुद्रधुनी (Hormuz Strait) बंद झाल्यामुळे आखाती देशांमधील जहाजांची वाहतूक पूर्णपणे विसकळीत झाली आहे. याचा सर्वात मोठा फटका भारताच्या बासमती तांदूळ निर्यातीला बसला असून, लाखो टन तांदळाचे कंसाइनमेंट सध्या समुद्रातच अडकून पडले आहेत. माल वाहतुकीचा मार्ग बंद झाल्यामुळे निर्यातदारांनी नवीन तांदळाची बॅगिंग आणि पॅकिंग प्रक्रिया पूर्णपणे थांबवली आहे. जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत 'वेट अँड वॉच' धोरण अवलंबले जात आहे.
समुद्रात अडकले 5 ते 6 हजार कोटींचे कंसाइनमेंट
'ऑल इंडिया राइस एक्सपोर्टर्स असोसिएशन'चे माजी अध्यक्ष विजय सेतिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुमारे 6 लाख टन बासमती तांदूळ एकतर भारतीय बंदरांवर, जहाजांवर किंवा गंतव्य देशांच्या बंदरांवर अडकून पडला आहे. या मालाची एकूण किंमत सुमारे 5,000 ते 6,000 कोटी रुपये आहे. इराण हा भारतासाठी मोठा ग्राहक असून, तिथे दरवर्षी 6 ते 7 लाख टन तांदूळ पाठवला जातो. इराणला बासमती निर्यातीचा विक्रमी आकडा 14 लाख टन इतका राहिला आहे. भारतातून दरवर्षी साधारणपणे 60 लाख टन बासमती तांदळाची निर्यात होते, त्यापैकी 70 टक्के निर्यात म्हणजेच सुमारे 45 लाख टन तांदूळ केवळ आखाती देशांना विकला जातो. मात्र, युद्धामुळे हा संपूर्ण व्यापार आता ठप्प झाला आहे.
हेही वाचा - Israel-Iran Conflict: खामेनीच्या हत्येचा निषेध नडला? 'या' मुस्लिम देशाचे सरकार पाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय ज्यू संघटना सक्रिय
निर्यातीची आकडेवारी आणि उत्पादन
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताने एकूण 60.65 लाख टन बासमती तांदळाची निर्यात केली होती, ज्याचे मूल्य 50,312 कोटी रुपये (5.94 अब्ज डॉलर) होते. भारताचे एकूण तांदूळ उत्पादन 15.01 कोटी टन असून त्यातील बासमतीचे उत्पादन 70 ते 75 लाख टन आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या काळात आखाती देशांना 32 लाख टनांहून अधिक तांदूळ निर्यात करण्यात आला होता. मात्र, युद्धाने या वाढत्या वेगाला अचानक ब्रेक लावला आहे.
देशांतर्गत बाजारपेठेवर काय होणार परिणाम?
जर इराण-इस्रायल संघर्ष दीर्घकाळ चालला, तर त्याचा थेट परिणाम भारतातील बासमती तांदळाच्या किमतींवर होऊ शकतो. निर्यात होणारा माल देशांतर्गत बाजारपेठेत उपलब्ध झाल्यास बासमती तांदळाचे दर मोठ्या प्रमाणात घसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. याचा फायदा ग्राहकांना झाला तरी, निर्यातदार आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर मात्र त्याचा विपरीत परिणाम होईल. सध्या सर्व निर्यातदार युद्ध थांबण्याची प्रतीक्षा करत आहेत.
हेही वाचा - Middle East Crisis And India: तेलाच्या राजकारणात भारताचा 'बॅलन्सिंग ॲक्ट'; प्रत्येक लिटर तेलावर आता युद्धाचे सावट, काय आहे देशाचा 'प्लॅन बी'?