मुंबई : विधानसभा निवडणुकांमधील विजयानंतर महायुतीला आता पालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. विधानसभेत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिल्यावर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांमध्ये दमदार कामगिरी करण्याची रणनिती महायुतीच्या नेत्यांनी आखली आहे. मुंबई आणि ठाणे महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता आहे. त्यांची सत्ता मोडीत काढायची असेल तर मराठी मतांची विभागणी टाळायला हवी, यासाठी मनसेला सोबत घेण्याचे संकेत भाजपाच्या नेत्यांनी दिले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
लोकसभेला भाजपाला पाठिंबा देणाऱ्या मनसेनं विधानसभेत 'एकला चलो रे' ची भूमिका घेतली. विधानसभेत मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. मनसेच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत आगामी निवडणुकीत युती करायची का? असा सूरही व्यक्त करण्यात आला. मात्र, त्यावर अद्याप मनसेकडून कोणताही निर्णय जाहिर केला नसला तरी त्यांचीही चाचपणी सुरू आहे.
हेही वाचा : शरद पवारांचे खासदार अजित पवारांच्या संपर्कात?
2007 साली पक्ष स्थापनेनंतर मनसेला केवळ 2009 विधानसभेत चांगले यश मिळाले. त्यानंतर नाशिक आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका वगळता त्यांना फारसे यश मिळाले नाही. राज ठाकरे यांनी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे 'आपण कोणालाही स्वतःहून डोळा मारणार नाही,' अर्थात मनसे कोणासोबत युती करणार नाही. पण, आता पक्षाला सावरायचा असेल तर सत्तेत राहणं अनिवार्य असल्याची चर्चा मनसेच्या आतील गोटात सुरू आहे. भाजपाकडून निवडणुकीसाठी हात पुढे होत असेल तर मनसेनेही हात पुढे करावा, असा सूर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आता भाजपा नेत्यांच्या भेटींमुळे भविष्यात होणाऱ्या संभाव्य युतीच्या चर्चा सुरू झाला आहेत.