Cricket News : उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये क्रिकेटच्या मैदानावर एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. अंडर-13 क्रिकेट लीगचा सामना सुरू असताना अचानक मधमाशांच्या थव्याने खेळाडू आणि पंचांवर हल्ला चढवला. या दुर्दैवी हल्ल्यात 65 वर्षीय वरिष्ठ पंच माणिक गुप्ता यांना आपला जीव गमवावा लागला असून, इतर काही खेळाडू आणि अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत.
मैदानात अचानक पसरली दहशत
उन्नाव येथील शुक्लागंजमधील सप्रू मैदानावर बुधवारी 'केडीएमए' (KDMA) अंडर-13 क्रिकेट लीगचा सामना सुरू होता. YMCC आणि पॅरामाउंट या दोन संघांमध्ये रंगलेल्या या सामन्यात दुसऱ्या डावाचा खेळ सुरू असताना अचानक मधमाशांचा मोठा थवा मैदानावर आला. मधमाशांनी डंख मारण्यास सुरुवात केल्यावर मैदानात एकच धावपळ उडाली. या हल्ल्यातून वाचण्यासाठी अनेक खेळाडूंनी जमिनीवर झोपून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र मधमाशांनी खेळाडूंसह पंचांना लक्ष्य केले.
पांढऱ्या कपड्यांमुळे मधमाशांचा रोख
या हल्ल्यात मुख्य पंच माणिक गुप्ता (65) यांना मधमाशांनी अक्षरशः वेढले होते. पंचांच्या पांढऱ्या कपड्यांमुळे मधमाशांचा थवा त्यांच्याकडे अधिक आकर्षित झाला आणि सुमारे 10 मिनिटे ते त्यांना डंख मारत राहिले. या हल्ल्यात गुप्ता यांना 50 हून अधिक डंख लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबत असलेले दुसरे पंच जगदीश शर्मा आणि काही तरुण खेळाडू देखील यात गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने शुक्लागंज येथील रुग्णालयात आणि त्यानंतर कानपूरमधील रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र वाटेतच माणिक गुप्ता यांची प्राणज्योत मालवली.
हेही वाचा - Former Captain Retirement: मोठी बातमी, T20 विश्वचषक 2026 दरम्यान माजी कर्णधाराची निवृत्तीची घोषणा
30 वर्षांच्या सेवेचा मैदानावरच दुर्दैवी अंत
मृत माणिक गुप्ता हे गेल्या 30 वर्षांपासून कानपूर क्रिकेट असोसिएशनच्या (KCA) पंच पॅनेलचे सक्रिय आणि निष्पक्ष सदस्य होते. त्यांना अंपायरिंगची प्रचंड आवड होती आणि त्यांनी आयुष्यभर या खेळाची सेवा केली. त्यांच्या निधनामुळे उत्तर प्रदेशातील क्रिकेट वर्तुळावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि 4 मुली असा परिवार आहे. सर्वात लहान मुलगी अद्याप शिकत असून, कुटुंबाचा संपूर्ण भार त्यांच्यावरच होता. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी मैदानांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
क्रिकेट वर्तुळातून हळहळ
KCA चे अध्यक्ष संजय कपूर यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, "माणिक गुप्ता हे खेळासाठी समर्पित व्यक्तिमत्त्व होते, त्यांच्या जाण्याने संघटनेची मोठी हानी झाली आहे." 19 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मधमाशांचा हल्ला एखाद्याचा जीव घेऊ शकतो, या कल्पनेनेच खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने आता अशा घटना रोखण्यासाठी मैदानांच्या परिसरात योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
हेही वाचा - Rohit Sharma: ‘मुंबईमध्ये राहतो, मराठी तर येणारच...’ रोहित शर्माच्या हास्यजत्रेच्या कलाकारांसोबत रंगल्या दिलखुलास गप्पा