Discord In Lalu Family: बिहार विधानसभा निवडणुकीत राजद नेतृत्वाखालील महाआघाडीचा अपेक्षाभंग झाला असून आता या आघाडीतील नेत्यांना सत्तेपासून दूर रहावे लागले. परंतु, या धक्क्याचा सर्वात गंभीर परिणाम लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबावर झाला. निवडणूक निकाल जाहीर होताच कुटुंबातील दडपलेला असंतोष उसळून बाहेर पडला आणि घरातील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आले.
रोहिणी आचार्य यांची बंडखोरी
महाआघाडीच्या पराभवानंतर लालू यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी एकामागोमाग एक गंभीर आरोपांची मालिका केली. त्यांनी थेट तेजस्वी यादव आणि त्यांच्या सल्लागार संजय यादव यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला. रोहिणींच्या मते, निवडणुकीतील पराभवाबाबत विचारणा केल्यावर त्यांना असभ्य वागणूक देण्यात आली. एवढेच नाही तर त्यांना चप्पलांनी मारण्याची धमकी दिल्याचाही त्यांनी दावा केला. या सर्व घटनांमुळे संतप्त झालेल्या रोहिणी यांनी पक्षीय राजकारणाबरोबरच कुटुंबाशीही संबंध तोडत त्या दिल्ली आणि नंतर सिंगापूरला रवाना झाल्या. आता त्या सोशल मीडियावरून आपली बाजू मांडत आहेत.
हेही वाचा - Bihar Cabinet Formation: बिहार मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला! कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदं मिळणार?
कुटुंबातील आणखी तीन मुलीही सोडणार घर
रोहिणी आचार्य यांच्या आरोपांनंतर लालू यादव यांच्या आणखी तीन मुलींनीही राबडी निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतला. आहे. यात चंदा यादव, राजलक्ष्मी यादव, रागिनी यादव यांचा समावेश आहे. या तिन्ही बहिणी आपल्या कुटुंबियांसह पाटण्याहून दिल्लीला स्थलांतरित झाल्या आहेत. रातोरात घर सोडण्याच्या या निर्णयाने कुटुंबातील तणाव किती प्रचंड वाढला आहे हे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीनंतर सत्तावाटप, निर्णयप्रक्रिया आणि नेतृत्वावरून मोठा मतभेद निर्माण झाल्याचे राजकीय वर्तुळात संकेत दिले जात आहेत.
हेही वाचा - Bihar Government Formulation : बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग; मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित
निवडणुकीतील पराभवामुळे वाढला ताण
निकालांपूर्वी राबडी निवासस्थानात सर्वत्र उत्साह साजरा करण्यासाठी तयारी सुरू होती. लालू कुटुंबाला प्रचंड विजयाची खात्री होती. बहिणी मुंबई-पटना-दिल्लीहून एकत्र जमा झाल्या होत्या. परंतु निकालांनी संपूर्ण परिस्थिती उलटी केली. लालू कुटुंबातील या बंडाचे मूळ निवडणुकीतील पराभव होता. वारशाने मिळालेल्या सत्तेला नेहमीच आव्हानांचा सामना करावा लागतो आणि या पराभवाने लालू कुटुंबात आता मोठा कलह निर्माण झाला आहे.