पुणे : सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेच्या असंतुलनावर चिंता व्यक्त केली आहे. पुणे शहर आणि परिसरात दररोज खून, मारामारी आणि लुटालूट यांसारख्या घटनांचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांना भीतीच्या छायेखाली जगावे लागते. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी राज्याच्या गृहखात्याचे आणि पुणे पोलिस आयुक्तांचे लक्ष वेधले असून, शहरातील कायदा सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.
पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या दोन सहकाऱ्यांमध्ये आर्थिक वादामुळे धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शुभदा शंकर कोदारे (२८) हिचा मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती अशी की, पुण्याच्या येरवडा भागातील WNS कंपनीच्या पार्किंगमध्ये ७ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. शुभदा कोदारे आणि कृष्णा कनोजा (३०) हे दोघेही आयटी कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होते. कृष्णाने काही पैसे शुभदा कोदारेला दिले होते, मात्र ती ती पैसे परत देण्यात टाळाटाळ करत होती. यावरून दोघांमध्ये वाद झाला होता.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
विवादाचे रूपांतर हल्ल्यात झाले, जेव्हा कृष्णाने धारदार हत्याराने शुभदाच्या उजव्या कोपरावर वार करून तिला गंभीर जखमी केले. जखमी झालेल्या शुभदाला सह्याद्री हॉस्पिटल, येरवडा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. येरवडा पोलिसांनी आरोपी कृष्णा कनोजाला अटक केली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
काय ट्विट केले आहे सुप्रिया सुळे यांनी : पुणे शहर आणि परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेची दुर्दशा झाली आहे. जवळपास दररोज एक-दोन खूनाच्या घटना घडतात. मारामारी, लुटालूट हे प्रकार तर नित्याचेच झाले आहेत. सर्वसामान्य माणूस भीतीच्या छायेखाली वावरत आहे.राज्याचे गृहखाते आणि पुणे पोलिस आयुक्तांनी या दुर्दशेची अधिक गांभीर्याने दखल घेऊन शहरातील कायदा सुव्यवस्थेची चौकट पुर्ववत करण्यासाठी काम करणे गरजेचे आहे.
👉👉 हे देखील वाचा : पुण्यात मित्राने मैत्रिणीवर केला धारदार चाकूने हल्ला