Mumbai-Pune New Highway Project : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाढती वाहतूक कोंडी ही प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या 32 तासांच्या भीषण वाहतूक कोंडीनंतर अखेर राज्य सरकारला जाग आली आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सरकारने 12,000 कोटी रुपयांचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे मुंबई आणि पुण्याच्या प्रवासाचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता आहे.
धूळ खात पडलेला प्रस्ताव पुन्हा चर्चेत
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील भार कमी करण्यासाठी 'उरण-कर्जत-शिरूर' महामार्गाचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून मंत्रालयात प्रलंबित होता. मात्र, अलिकडच्या काळात जयंत पाटील आणि इतर आमदारांनी विधानसभेत हा मुद्दा आक्रमकपणे मांडल्यानंतर सरकारने या हालचालींना वेग दिला आहे. हा नवीन महामार्ग 'बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा' (BOT) तत्त्वावर उभारला जाणार असून, यासाठी सुमारे 12,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भातील तांत्रिक प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
हा महामार्ग महत्त्वाचा का आहे?
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे कोकणातून पठारी भागावर जाण्यासाठी घाटांचा वापर करावा लागतो. माळशेज घाट ते लोणावळ्यातील बोरघाट यामध्ये सुमारे 70 ते 80 किलोमीटरचे मोठे अंतर आहे. सध्या जेएनपीटी (JNPT) बंदरातून निघणारे अवजड कंटेनर आणि मुंबई-ठाण्याहून पुणे, सोलापूर, सांगली, हैदराबाद किंवा बेंगलोरकडे जाणारी सर्व वाहने लोणावळा घाटातूनच जातात. यामुळे या मार्गावर प्रचंड ताण येतो. उरण-कर्जत-शिरूर महामार्ग झाल्यास जेएनपीटी आणि एमएमआर रिजनमधील अवजड वाहतूक थेट पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण भारताकडे वळवता येईल, ज्यामुळे एक्सप्रेसवेवरील कोंडी कमी होईल.
हेही वाचा - Starting Business On Highway: महामार्गावर पेट्रोल पंप किंवा ढाबा सुरू करायचाय? आता 'टेन्शन' संपलं! एका क्लिकवर मिळणार सर्व परवानग्या
कसा असेल नवा मार्ग आणि वैशिष्ट्ये?
हा प्रस्तावित महामार्ग एकूण 135 किलोमीटर लांबीचा असणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन दोन टप्प्यात करण्यात आले आहे:
टप्पा 1: यामध्ये 60 किलोमीटरचा रस्ता बांधला जाईल.
टप्पा 2 : उर्वरित 75 किलोमीटरचे काम पूर्ण केले जाईल.
हा महामार्ग 4 पदरी (Four-lane) असेल आणि यासाठी सुमारे 670 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. प्रवासातील अडथळे कमी करण्यासाठी या मार्गावर 5 बोगदे, 6 मोठे पूल आणि 48 छोटे पूल उभारण्याचे नियोजन आहे.
प्रवाशांना मिळणारा मोठा दिलासा
हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि पुण्याच्या दरम्यान प्रवासाचे एक नवीन जाळे निर्माण होईल. एक्सप्रेसवेवर अपघात किंवा तांत्रिक बिघाडामुळे होणारी वाहतूक कोंडी आता प्रवाशांना अडकवून ठेवणार नाही. अवजड वाहने या पर्यायी मार्गाने गेल्यामुळे एक्सप्रेसवेवरील वेग मर्यादेत सातत्य राहील आणि अपघातांचे प्रमाणही कमी होईल. हा प्रकल्प राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे.
हेही वाचा - Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गात मोठा बदल! बार्शीतून जाणार नवा मार्ग; मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात मोठी घोषणा