राज्यभरात पावसाने जोर धरला असून, अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 27 ते 29 सप्टेंबरदरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो.
मराठवाड्यात 27 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर अधिक राहील, तर कोकण व मध्य महाराष्ट्रात 25 ते 30 सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे. दरम्यान, मच्छिमारांना 24 ते 29 सप्टेंबरदरम्यान समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा - Ajit Pawar Statement : कर्जमाफीच्या प्रश्नावर अजित पवार भडकले, म्हणाले, 'इथे गोट्या खेळायला आलो...'
गेल्या काही वर्षांत मराठवाडा ढगफुटीप्रवण प्रदेश ठरत असून, वारंवार होणाऱ्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान होत आहे. या वर्षीच 12 ते 23 सप्टेंबरदरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास 24 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यात जीवितहानी व पशुधनाचे नुकसानही झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, हवामानातील बदल, वाढलेली आर्द्रता आणि ‘डाऊनरफ्ट’ ही प्रक्रिया यामागे कारणीभूत आहे.
हेही वाचा - CM Devendra Fadnavis on Amit Shah : संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची अमित शहांकडे मदतीची मागणी
भारतीय हवामान विभागाने बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात पुढील 5 दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क केले असून, नागरिकांना नदी, नाले आणि धरण परिसर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महत्त्वाची कागदपत्रे, औषधे व अन्नसाठा सुरक्षित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की सध्याचा पाऊस ढगफुटी नसून सलग काही दिवसांत जास्त प्रमाणात झालेली मुसळधार पर्जन्यवृष्टी आहे. मात्र, त्याचा परिणाम पूरस्थिती व पिकांचे नुकसान या स्वरूपात दिसत असल्याने प्रशासन सज्ज राहण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.