मुंबई: मे महिन्यातही उष्णतेचा कहर कमी न होता आता हवामानात अनपेक्षित बदल होत असून, महाराष्ट्रावर पुन्हा वादळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये विजांचा कडकडाट, गारपीट आणि जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 6 आणि 7 मे या दोन दिवसांत विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान खालावण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील 24 ते 48 तास अत्यंत संवेदनशील असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया आणि वाशिम या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, विजांचा कडकडाट व गारपीट होऊ शकते.
कोकण, गोवा, मुंबई-पुणे परिसरातही अस्थिर वातावरण
मुंबईतील कुलाबा प्रादेशिक हवामान केंद्राच्या अहवालानुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील पाच ते सात दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे परिसरात ढगाळ वातावरण आणि मध्यम स्वरूपाच्या वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवास करताना व नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
जालना जिल्ह्यात गडगडाटासह वादळी पाऊस
जालना जिल्ह्यात येत्या तीन दिवसांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा अनुभव येण्याची शक्यता आहे. काही भागांत गारपीट होणार असल्याने शेती पिकांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हवामान खात्याने शेतकऱ्यांना आगाऊ सूचना दिली असून, पिकांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तापमानाने गाठला उच्चांक
राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. मालेगाव (42.4°C), परभणी, सोलापूर, अकोला या शहरांत तापमान उच्चांकी नोंदले गेले आहे. वाशिममध्ये तब्बल 42.8 अंश सेल्सिअस इतका पारा नोंदवला गेला आहे. याचवेळी आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे.
हवामान विभागानुसार सध्या मध्य प्रदेश, मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्याच्या वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. पुढील चार दिवस राज्यात वेगवेगळ्या भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अनुभव येण्याची शक्यता अधिक असल्याचे संकेत हवामानशास्त्रज्ञांनी दिले आहेत.
शेतकऱ्यांसाठी धोका वाढला,
आकस्मिक गारपीट व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक नुकसान होण्याची शक्यता दाट आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने शेतकऱ्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक संरक्षक उपाय, तातडीची झाकणं, विहिरीतील पाणी साठवण व मातीच्या बांधांची योग्य व्यवस्था करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.