जालना: मराठा आरक्षणासाठी अखेरचा आणि निर्णायक लढा उभारण्याचा मनोज जरांगे पाटील यांनी जाहीरनामा केला आहे. अक्षय्य तृतीयेनिमित्त त्यांनी आपल्या भाषणात मराठा समाजासाठी सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला. 'शिंदे समितीने सापडलेल्या नोंदींचं कौतुक आहे, पण सरकारने एकही मागणी पूर्ण केली नाही,'असे स्पष्ट शब्दांत सांगितले
मनोज जरांगे यांनी ‘चलो मुंबई’ आंदोलनाची तारीख 29 ऑगस्ट 2025 जाहीर केली. यावेळी आझाद मैदान किंवा मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 'आता संयम संपला आहे, आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही.' अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.
जरांगे यांनी सरकारवर फसवणुकीचे आरोप करत म्हटले, की '4 दिवसांत चार मागण्या पूर्ण करतो असं सांगून सरकारने तीन महिने उलटूनही काहीच केलं नाही.' त्यांनी दावा केला की, 58 लाख नोंदी असूनही अनेक अधिकाऱ्यांकडून जात प्रमाणपत्र देण्यात टाळाटाळ केली जात आहे. 'ज्यांचं नाव नोंदांमध्ये सापडलं, त्यांच्या ग्रामपंचायतीवर त्या नोंदी लावून तात्काळ जात प्रमाणपत्र द्या,' अशी त्यांनी जोरदार मागणी केली. शिवाय, 'अशा जातीयवादी अधिकाऱ्यांना निलंबित करा' अशी मागणीही मुख्यमंत्री आणि प्रशासनाकडे त्यांनी लावून धरली. 'सरकारकडे आता कोणतंही कारण शिल्लक नाही, आणि जर मराठ्यांचे आंदोलन थांबवायचे असेल तर 6 जूनच्या आत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा,' असा अल्टिमेटमही त्यांनी दिला.
राजकारणातील नेत्यांवरही त्यांनी परखड टीका केली. 'फडणवीस, तुम्ही मराठ्यांच्या नोकऱ्या रोखल्या, सत्ता जात असते, लोकांचा संताप उफाळला की बदल अटळ असतो,' असा इशारा त्यांनी दिला. तसेच छगन भुजबळ यांनाही लक्ष्य करत म्हणाले, 'तुमचं ओबीसी राजकारण आता कुणालाच मान्य नाही. तुमच्या कोर्टात गेलेल्या लोकांमुळेच मराठ्यांचं नुकसान झालं आहे.'
अखेर, जरांगे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, '29 ऑगस्टला जर मुंबईत माझ्या मुलांना काही झालं, तर आमदार-खासदारांना घराबाहेर निघू देणार नाही.' समाजबांधवांना उद्देशून त्यांनी 1ऑगस्टला आंदोलनाच्या रणनीतीची घोषणा करणार असल्याचं सांगत, 'आजपासून ‘चलो मुंबई’ची तयारी सुरू करा असा प्रखर संदेश दिला.