Raj Thackeray MNS : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील दीपोत्सव गेली अनेक वर्षे सुरू आहे आणि तो अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. मात्र, याबाबत राज ठाकरे किंवा मनसेकडून त्याचे श्रेय घेणारी बॅनरबाजी कधीही करण्यात आली नव्हती. मनसेतर्फे शिवाजी पार्क येथे केलेली आकर्षक रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी मुंबईतील आणि मुंबईबाहेरील लोक दूरवरून येत असतात. डोळ्यांचे पारणे फेडणारी ही आतषबाजी पाहण्यासाठी दररोज प्रचंड गर्दी होते. मनसेतर्फे गेल्या 13 वर्षांपासून हा दीपोत्सव केला जात आहे. परंतु, मनसेने स्वतःच कधी याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
आता महायुती सरकारच्या पर्यटन विभागाने परस्पर मनसेच्या या दीपोत्सवाचे श्रेय लाटण्याचा प्रकार केला आहे. पर्यटन खात्याने त्यांच्या अधिकृत एक्स (X) हँडलवर एक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी शिवाजी पार्क मैदानावरील दीपोत्सवाची काही क्षणचित्रे दाखवून, 'तुम्ही अजून छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील फटाक्यांची आकर्षक आतषबाजी पाहिली नसेल तर तुम्ही दिवाळीत मुंबईतील उत्कृष्ट जागेला मुकत आहात,' असे मुंबईतील आणि मुंबईबाहेरील पर्यटकांना आवाहन केले आहे. मात्र, या पोस्टमध्ये कुठेही मनसेचा उल्लेख नाही. यामुळे मनसे अनेक वर्षापासून करत असलेल्या या कार्यक्रमाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मनसेने केले आहे.
मनसेची खरमरीत पोस्ट
पर्यटन खात्याच्या या जाहिरातबाजीवरून मनसेने त्यांच्या एक्स हँडलवरून कडक शब्दांत कानउघडणी केली आहे. मनसेने म्हटले, “दिवाळी हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण आहे आणि या सणाच्या निमित्ताने गेली 13 वर्ष दीपोत्सव हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजी पार्क मैदानावर करत आहे. हा दीपोत्सव महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत असली तरी तो पूर्ण अराजकीय राहील हे आम्ही पाहिलं आहे आणि आमचा उद्देश फक्त आणि फक्त लोकांना आनंद मिळावा हाच आहे आणि राहील.”
हेही वाचा - Gold Rate Drop: यूएस-चीन तणावाचा परिणाम सोन्याच्या दरावर; सोन्याच्या दरात घट; गुंतवणूकदारांचा कल बदलला
मनसेने पुढे आश्चर्य व्यक्त करत म्हटले, “पण जेंव्हा महाराष्ट्र सरकारचा एक विभाग या दीपोत्सवाचं मार्केटिंग स्वतः हा विभाग करत असल्यासारखं दाखवतो, तेंव्हा विशेष आश्चर्य वाटलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचे अगदी छोटंसं श्रेय दिलं असते, तर निश्चित आम्हाला आनंद झाला असता आणि सरकारच्या मनाचा उमदेपणा दिसला असता.” नाशिकमध्ये मनसेने जे काम केले, ते पुढे तत्कालीन सरकारने केले अशी जाहिरातबाजी झाली होती, याचा संदर्भही मनसेने दिला.
“तुमचे नेते ते आमचे नेते, तुमचा पक्ष आमचा पक्ष अशी कार्यपद्धती सत्ताधारी पक्षाची आहे, हे दिसतंच आहे. पण आता दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असे वाटले नव्हते! असो… आम्ही मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एक अभिजात कार्यक्रम यावर्षी केला, दीपोत्सव तर असतोच; असे सामान्यांना आनंद देणारे अनेक उपक्रम आम्ही करत राहणार आहोतच. त्यावेळी देखील पर्यटन विभागाला ते आमचे आहेत म्हणण्याचा मोह होईल, इतके ते छान करूच, फक्त त्यावेळेस त्याचं श्रेय आमच्या पक्षाला जरूर द्या, म्हणजे झाले!!”, असे आवाहन मनसेने शेवटी केले.
हेही वाचा - Sanjay Raut on Mahesh Kothare: तात्या विंचू तुमचा गळा दाबेल..! भाजप प्रेमाची कबुली देताच महेश कोठारेंना संजय राऊतांचा थेट इशारा