Mohammed Shami: भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तब्बल सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर तो रणजी ट्रॉफी 2025-26 च्या पहिल्या सामन्यात मैदानात उतरला. शमीन आपल्या घातक गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. फिटनेसबाबत चाललेल्या चर्चेला शमीने थेट मैदानावरूनच उत्तर दिलं.
शमीचा धमाकेदार पुनरागमन सामना
बंगालच्या वतीने उत्तराखंडविरुद्ध खेळताना, शमीने पहिल्या डावात फक्त 14.5 ओव्हरमध्ये 37 धावांत तीन विकेट्स घेतल्या. विशेष बाब म्हणजे त्याने चारच चेंडूत तीन विकेट्स घेतल्या. 15 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पहिली, तर तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे दोन विकेट्स घेत त्याने प्रतिस्पर्ध्यांना हादरवले.
हेही वाचा - Women's T20 Trophy : महाराष्ट्राच्या मातीतल्या या महिला खेळाडूनं मोडला जागतिक विक्रम; टी-20 मध्ये 34 चेंडूत झळकावलं शतक
दुसऱ्या डावातही शमीचा जलवा कायम राहिला. त्याने 24.4 ओव्हरमध्ये 38 धावा देत चार बळी घेतले. एकूण सात विकेट्स घेत शमीने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली. एकूण 40 ओव्हर टाकत त्याने फिटनेस आणि सहनशक्तीची परिपूर्ण परीक्षा दिली. मोहम्मद शमीने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, 'जर माझ्या फिटनेसचा प्रश्न असता, तर मी रणजी खेळलोच नसतो. मी चॅम्पियन्स ट्रॉफी, आयपीएल आणि दुलीप ट्रॉफी खेळलो आहे. मी उत्तम टचमध्ये आहे. जर मी चार दिवसीय सामन्यात गोलंदाजी करू शकतो, तर 50 ओव्हरचं क्रिकेटही सहज खेळू शकतो.' त्याच्या या विधानानंतर चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा त्याच्या टीम इंडियामध्ये पुनरागमनाची अपेक्षा वाढली आहे.
हेही वाचा - Asia Cup 2025: मोहसिन नकवीने 'या' ठिकाणी ठेवली आहे आशिया कप ट्रॉफी; समोर आली धक्कादायक माहिती
दरम्यान, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी शमीच्या फिटनेसवर भाष्य करताना म्हटलं की, 'शमी भारताचा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. मागील काही महिन्यांत तो पूर्णपणे फिट नव्हता, त्यामुळे आम्हाला त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडता आलं नाही. पण जर आता तो खरोखरच फिट असेल, तर येत्या महिन्यांत त्याची परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते.' शमीच्या या प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याचं जोरदार कौतुक केलं आहे.