Raigad Zilla Parishad Panchayat Samiti Election : रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला शुक्रवार, 16 जानेवारी 2026 पासून अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. मात्र, पहिल्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला. प्रशासकीय यंत्रणा सकाळी 11:00 वाजल्यापासून सज्ज असूनही एकाही उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला नाही. आता खऱ्या अर्थाने सोमवारपासून उमेदवारांची झुंबड उडण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे.
निवडणुकीचे वेळापत्रक आणि रिक्त जागांचे गणित
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 59 जागा आणि 15 पंचायत समित्यांच्या एकूण 118 जागांसाठी येत्या 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची मुदत 16 ते 21 जानेवारी अशी निश्चित करण्यात आली आहे. शनिवारीदेखील अर्ज येण्याची शक्यता धूसर असून रविवारी सुट्टी असल्याने ही प्रक्रिया बंद राहील. परिणामी, सोमवार ते बुधवार या तीन दिवसांतच अर्जांचा महापूर येण्याचा अंदाज आहे. निवडणूक कार्यालयाबाहेर सुरक्षेच्या कारणास्तव चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
'पौष' महिना आणि कागदपत्रांची अडचण
पहिल्या दिवशी अर्ज न येण्यामागे काही खास कारणे असल्याचे बोलले जात आहे. अनेक उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव अजून पूर्ण झालेली नाही. तसेच, राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मोठे नेते गुंतले असल्याने स्थानिक पातळीवर उमेदवारीचे निर्णय अद्याप प्रलंबित आहेत. काही ठिकाणी पक्षांतर्गत मतभेदही समोर येत आहेत. विशेष म्हणजे, सध्या 'पौष' महिना सुरू असल्याने हा काळ शुभ मानला जात नाही, त्यामुळे अनेक उमेदवार सोमवारच्या मुहूर्तावरच अर्ज दाखल करण्यास पसंती देत आहेत.
हेही वाचा - Mahapalika Election 2026 : मतदानाची शाई पुसल्याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; पुन्हा एकदा 'म्हैसूर पॅटर्न' परतणार
ऑफलाइन अर्जांमुळे उमेदवारांना मोठा दिलासा
यंदा निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात इंटरनेटचा वेग कमी असणे आणि सर्व्हर डाउन होण्याच्या तक्रारी नेहमीच उद्भवतात. ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांचा वेळ वाया जातो, हे लक्षात घेऊन आयोगाने केवळ ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील इच्छुकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, अर्ज भरण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी आणि विनाअडथळा पार पडणार आहे.
राजकीय हालचालींना वेग
जिल्हा परिषदेची ही निवडणूक आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सोमवारी सकाळी 10:30 वाजल्यापासूनच विविध पक्षांचे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत. रायगडच्या राजकारणात आपला गड शाबूत ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आता कंबर कसली असून, पुढील 3 दिवस रायगडकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
हेही वाचा - Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी गुड न्यूज; नेमकं कुठे होणार नवीन स्टेशन? पाहा प्रवाशांना मिळणाऱ्या 'या' आधुनिक सुविधा