Indian Village of Teachers : भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, जी त्यांच्या ऐतिहासिक किंवा भौगोलिक वैशिष्ट्यांसाठी ओळखल्या जातात. परंतु, देशात एक गाव असे आहे, ज्याने शिक्षणाच्या जोरावर स्वतःची ओखळ निर्माण केली आहे. या गावात तब्बल 700 घरे असून त्यापैकी 400 हून अधिक लोक शिक्षक आहेत, तर 100 पेक्षा जास्त जण मुख्याध्यापक (Principal) पदावर कार्यरत आहेत. एकाच गावातून एवढ्या मोठ्या संख्येने शिक्षक निर्माण होणे, ही बाब या गावाला खास बनवते. येथील शिक्षणाच्या अनोख्या परंपरेमुळे या गावाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
150 वर्षांची शैक्षणिक परंपरा
उत्तर प्रदेशातील एका गावाने केवळ शिक्षणाच्या जोरावर बुलंदशहर जिल्ह्यातील सांखनी (Sankhni) हे गाव आज 'शिक्षकांची फॅक्टरी' म्हणून ओळखले जाते. सांखनी गावातील शिक्षणाची ही परंपरा आजची नसून ती सुमारे 150 वर्षांपूर्वी सुरू झाली आहे. या गावातील शिक्षणाची खरी सुरुवात 1876 मध्ये एका मदरशाच्या स्थापनेने झाली. त्यानंतर 1880 मध्ये तुफैल अहमद हे या गावातील पहिले शिक्षक बनले आणि तिथूनच या गौरवशाली प्रवासाला सुरुवात झाली. आज परिस्थिती अशी आहे की, गावातील जवळपास प्रत्येक कुटुंबात किमान एक तरी सदस्य शिक्षक आहे आणि अनेक घरांमध्ये तर पती-पत्नी दोघेही शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. गावातील शिक्षक हुसेन अब्बास यांनी ‘तहकीकी दस्तावेज’ नावाच्या पुस्तकात या गावाची ही प्रेरणादायी गाथा जतन केली आहे.
हेही वाचा - Marathi Medium Schools : नवी मुंबई महापालिकेच्या शाळांचा 'मेकओव्हर' की मराठी भाषेवर घाला?; मराठी शाळा बंद करून इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा प्रस्ताव
मुलींच्या शिक्षणातही आघाडी
केवळ पुरुषच नव्हे, तर या गावातील मुली आणि महिलांनीही शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. अनेक महिला आज सरकारी शाळांमध्ये शिक्षिका म्हणून आपली सेवा देत आहेत. शिक्षणाप्रति असलेली ही जिद्द केवळ शिक्षक पेशापुरती मर्यादित नाही, तर इतर क्षेत्रांतही गावातील मुले झेंडा रोवत आहेत. याच गावातील एका विद्यार्थिनीने वैद्यकीय प्रवेश परीक्षेत राज्यात अव्वल स्थान पटकावून राज्यपालांच्या हस्ते सन्मान मिळवला होता. लहानपणापासूनच घरात शिक्षणाचे वातावरण असल्याने येथील मुलांमध्ये आपोआपच अभ्यासाची गोडी निर्माण होते.
मोफत कोचिंग आणि शिक्षणासाठी सामूहिक प्रयत्न
सांखनी गावातील यशाचे रहस्य येथील सामूहिक प्रयत्नांमध्ये दडलेले आहे. स्पर्धा परीक्षा किंवा सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी गावातच मोफत कोचिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. गावातील कार्यरत शिक्षक आणि बाहेर स्थायिक झालेले माजी विद्यार्थी वेळ काढून तरुणांना मार्गदर्शन करतात. ज्ञानाचे हे दान पिढ्यानपिढ्या पुढे नेले जात असल्यामुळेच हे गाव आज उत्तर प्रदेशातच नव्हे, तर संपूर्ण भारतात शिक्षणाची एक आदर्श उदाहरण ठरले आहे.
हेही वाचा - Revised NCERT Syllabus: शालेय शिक्षणात मोठी क्रांती! NCERT कडून पहिली ते आठवीसाठी नवी कोरी डिजिटल पुस्तकं
(Disclaimer : वरील माहिती सामान्य स्त्रोतांवर आधारित असून तिच्या अचूकतेची स्वतंत्र पडताळणी केलेली नाही.)