IND vs PAK T20 Match: टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्याबाबत अखेर संभ्रम संपला आहे. पाकिस्तानने सुरुवातीला या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची भाषा केली होती; मात्र, आयसीसीच्या (ICC) मध्यस्थीनंतर त्यांनी माघार घेत खेळण्यास संमती दिली आहे. पाकिस्तानच्या या 'यू-टर्न'मुळे तेथील माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी प्रचंड संतापला असून त्याने एका टीव्ही शोमध्ये भारताबाबत अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. आफ्रिदीच्या या विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून भारतीय नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले आहे.
काय म्हणाला शाहिद आफ्रिदी?
एका पाकिस्तानी न्यूज चॅनेलवरील चर्चेत सहभागी झालेला आफ्रिदी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या गुडघे टेकण्यावरून संतप्त झाला होता. संताप व्यक्त करताना त्याने थेट भारताच्या राजकारणावर आणि नेतृत्वावर टीका केली. तो म्हणाला, "भारताला सध्या 4 गुजराती चालवत आहेत. त्यातील दोन जण (देश) विकत आहेत आणि दोन जण खरेदी करत आहेत. या चौघांना खूश ठेवण्यासाठीच त्यांच्या हाताखाली काम करणारे लोक अशा प्रकारे दबाव निर्माण करतात." आफ्रिदीचे हे विधान थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि उद्योजक अदानी-अंबानी यांच्या संदर्भात असल्याचे मानले जात आहे.
15 फेब्रुवारीला रंगणार महामुकाबला
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा रोमांचक सामना रविवार, 15 फेब्रुवारी 2026 रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकानुसार दोन्ही संघ अ गटामध्ये (Group A) आहेत. यापूर्वी पाकिस्तानने बांगलादेशच्या मुद्द्यावरून भारताविरुद्ध न खेळण्याची भूमिका घेतली होती; मात्र, आयसीसीने दंड आणि निलंबनाचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तान सरकारने माघार घेत आपल्या संघाला मैदानात उतरण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा - T20 World Cup: टीम इंडियाचं टेंशन वाढलं; पोटाच्या संसर्गामुळे स्टार सलामीवीर खेळाडू रुग्णालयात दाखल
पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाची हतबलता
आफ्रिदीच्या विधानावरून हे स्पष्ट होते की, पाकिस्तानमधील माजी खेळाडूंना आपल्या बोर्डाचा हा निर्णय आवडलेला नाही. "प्रथम बहिष्काराची भाषा करायची आणि नंतर त्याच देशासोबत खेळण्यासाठी लाचारी पत्करायची, यामुळे देशाची जगात नाचक्की झाली आहे," अशी टीका आफ्रिदीने केली. पीसीबी (PCB) अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी आयसीसीच्या बैठकीनंतर स्पष्ट केले की, खेळाचा सन्मान राखण्यासाठी आम्ही खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आफ्रिदीने या सर्व वादाचे खापर भारतावर फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतीय नेटकऱ्यांकडून आफ्रिदीला चोख प्रत्युत्तर
आफ्रिदीच्या या विधानानंतर सोशल मीडियावर भारतीयांनी त्याचा जुना रेकॉर्ड काढून त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. "मैदानावर भारताविरुद्ध कधीही न टिकणारा आफ्रिदी आता वैफल्यग्रस्त झाला आहे," अशा कमेंट्स युजर्स करत आहेत. दरम्यान, भारतीय संघ सध्या जोरदार फॉर्ममध्ये असून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघ या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून गटात पहिले स्थान मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या भारताचा नेट रनरेट पाकिस्तानपेक्षा सरस असून 15 फेब्रुवारीचा सामना विजयासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
हेही वाचा - T20 World Cup 2026 IND vs PAK: पाकिस्तानने शरणागती पत्करली! पीसीबीची अट फेटाळत भारत-पाकिस्तान सामन्याबाबत आयसीसीने घेतला मोठा निर्णय