NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चेत अडथळे येत असताना, आता शरद पवार यांनी आपला दिल्ली दौरा अचानक रद्द केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी ते दिल्लीला जाणार होते, मात्र हा दौरा गुंडाळून ते थेट पुण्याकडे रवाना झाले आहेत.
विलीनीकरणाला खीळ आणि अध्यक्षपदाचा सस्पेन्स
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील, अशी चिन्हे दिसत होती. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर या विलीनीकरणाच्या धोरणाला खीळ बसली आहे. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी विलीनीकरणाच्या चर्चेतून माघार घेतल्याने एक मोठा पेच निर्माण झाला आहे. विलीनीकरणाऐवजी आता पक्षाचा पुढचा 'राष्ट्रीय अध्यक्ष' कोण होणार, यावर चर्चा केंद्रित झाली आहे. विशेष म्हणजे, अजित पवार गटातून सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष बनवावे, अशी मागणी जोर धरत आहे. यासाठी अनेक आमदारांनी सह्यांचे पत्र प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांना सोपवले आहे.
हेही वाचा - Nashik NCP : "दादांच्या निधनानंतर राजकारण खेळतायत" नाशिकमध्ये राष्ट्रवादीत अंतर्गत वाद उफाळला; नगरसेविकेचा गंभीर विधान
पवारांचा दिल्ली दौरा रद्द आणि बारामती मुक्काम
खासदार शरद पवार सध्या मुंबईत असून ते संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला जाणार होते. परंतु, ऐनवेळी त्यांनी आपला हा दौरा रद्द केला असून ते आता पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज त्यांचा मुक्काम पुण्यात असून, पुढील 2 ते 3 दिवस ते बारामतीमध्ये राहण्याची शक्यता आहे. बारामतीत ते कार्यकर्त्यांशी आणि कुटुंबातील सदस्यांशी महत्त्वाची चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवारांच्या या 'अचानक' घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या आगामी रणनीतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
सुनेत्रा पवार यांच्याकडे सूत्रे जाणार?
अजित पवार यांच्या जाण्याने रिक्त झालेले उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारी 2026 रोजी स्वीकारले असून, त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. आता उपमुख्यमंत्रीपदानंतर त्यांच्याकडे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदही सोपवले जावे, अशी मागणी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक सेलसह 30 हून अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाला पसंती दिली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे पुणे-बारामती दौरे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
हेही वाचा - Sanjay Raut: "आता राष्ट्रवादीवर गिधाडे तुटून पडतील" अजित पवारांच्या निधनानंतर संजय राऊतांच्या आरोपांची तोफ दिल्लीमधून धडाडली