Saturday, March 07, 2026 02:06:10 AM

Sindhudurg News : तीन दिवस आणि तीन रात्री वायंगणी गाव राहणार वेशीबाहेर! श्री देव रवळनाथाच्या हुकुमानंतर 'गावपळण' सुरू

गावपळणीच्या काळात सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन एकोप्याने राहतात. ग्रामस्थ आपल्यासोबत गुरेढोरे, पाळीव प्राणी आणि जीवनावश्यक साहित्य घेऊन आचरा हिर्लेवाडी, कालावल आणि सडयेवाडी भागात वास्तव्यास गेले.

sindhudurg news  तीन दिवस आणि तीन रात्री वायंगणी गाव राहणार वेशीबाहेर श्री देव रवळनाथाच्या हुकुमानंतर गावपळण सुरू

Sindhudurg News : कोकणातील मालवण तालुक्यातील वायंगणी या निसर्गरम्य गावात शेकडो वर्षांची प्राचीन परंपरा असलेला 'गावपळण' उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने सुरू झाला आहे. सोमवारी दुपारपासून श्री देव रवळनाथाच्या हुकुमानंतर संपूर्ण गाव वेशीबाहेर वास्तव्यास गेला आहे. विशेष म्हणजे, या गावात केवळ ग्रामस्थच नाही तर ग्रामदैवत श्री देव रवळनाथ देखील भक्तांसोबत वेशीबाहेर जातात, ज्याला 'देवपळण' असेही म्हटले जाते. सुमारे 2000 लोकवस्ती असलेल्या या गावाने आधुनिकतेच्या प्रवाहातही आपली ही अनोखी संस्कृती जपली आहे.

सोमवारी पहाटे 2:30 वाजता गावातील मानकरी आणि सेवेकरी ग्रामदेवतेचे प्रतीक असलेले श्रीफळ घेऊन अत्यंत शांततेत चिंदर सडेवाडी येथे रवाना झाले. तिथे असलेल्या घुमटीत देवाची पूजाअर्चा झाल्यानंतर प्रत्यक्ष गावपळणीला सुरुवात झाली. आचरा परिसरातील इतर गावांमध्ये फक्त ग्रामस्थ बाहेर जातात, मात्र वायंगणीत प्रत्यक्ष देवही वेशीबाहेर स्थिर होतात. गावातील मंदिरे, घरे आणि शाळांच्या दरवाजांना 'झाप' (नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेले आच्छादन) लावून ते पूर्णपणे बंद करण्यात आले असून संपूर्ण गाव आता निसर्गाच्या सानिध्यात राहुट्या करून राहत आहे.

हेही वाचा - Tamhini Ghat Alternative Route: ताम्हिणी घाटातील वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार? 50 किलोमीटर अंतर कमी करणारा 'हा' नवा मार्ग लवकरच होणार सुरू

श्रद्धा, एकता आणि पर्यावरणाचा संदेश
गावपळणीच्या काळात सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन एकोप्याने राहतात. ग्रामस्थ आपल्यासोबत गुरेढोरे, पाळीव प्राणी आणि जीवनावश्यक साहित्य घेऊन आचरा हिर्लेवाडी, कालावल आणि सडयेवाडी भागात वास्तव्यास गेले आहेत. या तीन दिवसांच्या काळात ग्रामस्थ मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर राहून निसर्गाशी नाते जोडतात. गाव पूर्णपणे निर्मनुष्य झाल्यामुळे पर्यावरणाचे शुद्धीकरण होण्यास मदत होते, असा ग्रामस्थांचा विश्वास आहे. यापूर्वी 2019 मध्ये मार्च महिन्यात अशा प्रकारे वायंगणीची गावपळण पार पडली होती.

26 फेब्रुवारीला 'गाव भरण्याचा' कौल
नियम आणि परंपरेनुसार, तीन दिवस आणि तीन रात्री वेशीबाहेर राहिल्यानंतर 26 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता गाव पुन्हा भरण्याचा विधी पार पडणार आहे. यावेळी गावाचे बारापाच मानकरी आणि ग्रामस्थ श्री देव रवळनाथाला पुन्हा गावात परतण्यासाठी 'कौल' लावणार आहेत. देवाने परवानगी दिल्यानंतरच सर्व ग्रामस्थ आपापल्या घरी परततील. महिला आणि लहान मुले देखील या उत्सवात मोठ्या उत्साहाने सहभागी झाली आहेत.

हेही वाचा - Kokan Travel News: कोकणवासीयांसाठी फडणवीस सरकारचं खास 'शिमगा गिफ्ट'; विजयदुर्गापर्यंत फक्त सात तासांत बोटीने सफर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक


सम्बन्धित सामग्री