पालघर : पालघरमध्ये आदिवासी महिलेने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर येत आहे. जमिनीचा मोबदला न मिळाल्याने आत्महत्या झाल्याचे दिसून येत आहे. ही आत्महत्या नसून शासनाने घेतलेला बळी असल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
पालघर जिल्ह्यात मुंबई वडोदर एक्सप्रेस वे चे काम प्रगतीपथावर असून तलासरीमधील बोरमाळ, कोचाई येथे मागील दोन दिवसांपासून ठेकेदार कंपनी, भूसंपादन अधिकारी यांनी पोलीस बंदोबस्तात आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी मोबदला न देता ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. तर काही बाधित शेतकऱ्यांना प्रांत अधिकारी यांनी दोन दिवसांपूर्वी जमिनीचा मोबदला चेकद्वारे दिला. परंतु कोचाई गुरोड मधील परशुत बरफ यांची वडिलोपार्जित वहिवाटदार असलेली जागा ते कसत होते. परसूत बर्फ हे कामानिमित्त बोटीत गेले असताना त्यांच्या जमिनीचा मोबदला कुटुंबाकडे दिला गेला नसल्याने परशुत बर्फ यांची पत्नी लक्ष्मी बर्फ ही गेल्या दोन-तीन दिवसांमधून मानसिक तणावाखाली जगत होती.
जमिनीचा मोबदलाही दिला गेला नाही आणि जमिनी आमच्या ताब्यातून जाणार असे परशुत बर्फ यांची पत्नी लक्ष्मी बर्फ बोलत होती. गुरुवारी घरात कोणी नसताना तिने स्वतः ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. ही आत्महत्या नसून हा शासनाने घेतलेला बळी असल्याचा आरोप त्यांचे कुटुंबीय करत आहेत.