Wednesday, May 21, 2025 02:29:28 PM

मुंबईत तूर्तास पाणीकपात नाही; धरणांमध्ये पुरेसा जलसाठा, महापालिकेची माहिती

मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे, महानगरपालिकेने पाणीकपात करण्याची गरज सध्या भासणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मुंबईत तूर्तास पाणीकपात नाही धरणांमध्ये पुरेसा जलसाठा महापालिकेची माहिती

मुंबई: मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे, महानगरपालिकेने पाणीकपात करण्याची गरज सध्या भासणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सातही धरणांमध्ये एकूण 22.66 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा 31 जुलैपर्यंत पुरेल, असे पालिकेचे जल अभियंते सांगतात. शासनाकडूनही ‘निभावणी साठ्या’तून अतिरिक्त पाणी मिळणार असल्याने तातडीचा धोका नाही. 

मुंबईतील सात प्रमुख धरणे ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी  ही शहराला दररोज 3,900 दशलक्ष लिटर पाणी पुरवतात. या धरणांची एकत्रित साठवण क्षमता सुमारे 14.47 लाख दशलक्ष लिटर असून सध्या त्यात 3.28 लाख दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. यावर आधारित महापालिकेने ठामपणे सांगितले आहे की, जून-जुलै दरम्यान शहरात पाणीकपात होणार नाही.

महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. हवामान विभागाशी सुसंवाद साधून पावसाच्या अंदाजावर लक्ष ठेवले जात आहे. पालिकेच्या जल विभागाने 31 जुलैपर्यंत पुरेल अशा प्रकारे साठ्याचे व्यवस्थापन आखले आहे, आणि त्यापुढील धोरणे पावसाच्या आगमनानंतर ठरवली जातील.

मात्र, पालिकेच्या या दाव्यांनंतरही वस्तुस्थिती वेगळी आहे. मुंबईतील अनेक झोपडपट्ट्यांपासून ते गृहनिर्माण सोसायट्यांपर्यंत अनेक भागांमध्ये दररोजच्या पाणीपुरवठ्यात खंड पडत आहे. काही ठिकाणी दोन-दोन दिवस पाणी येत नाही. नागरिक टाक्यांवर अवलंबून राहत आहेत, काही ठिकाणी टँकरवर भिस्त ठेवावी लागते. त्यामुळे पाणीकपात नाही, हे केवळ तांत्रिकरीत्या खरं असलं तरी, अनुभव मात्र वेगळाच आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, विहार आणि तुळशी धरणात अनुक्रमे 34.04% व 35.27% पाणीसाठा आहे, जे तुलनेत अधिक असले तरी उर्वरित पाच धरणांमध्ये साठा 20-25% दरम्यान आहे. 


 


सम्बन्धित सामग्री