Thursday, May 22, 2025 07:18:05 PM

उरीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था; पाकड्यांकडून एलओसीजवळ पुन्हा युद्धबंदीचं उल्लंघन

दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी राज्यात अलर्ट जारी केला असून उरी सेक्टरमध्ये विशेषत: कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

उरीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था पाकड्यांकडून एलओसीजवळ पुन्हा युद्धबंदीचं उल्लंघन

जम्मू काश्मीर: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी राज्यात अलर्ट जारी केला असून उरी सेक्टरमध्ये विशेषत: कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान, पाकिस्तानकडून पुन्हा एकदा नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचं उल्लंघन करण्यात आलं आहे.महामार्गावरील वाहतूक नियंत्रणात ठेवत, प्रत्येक वाहनाची कसून 

श्रीनगर-उरी राष्ट्रीय महामार्गावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. महामार्गावरील वाहतूक नियंत्रणात ठेवत, प्रत्येक वाहनाची कसून तपासणी सुरू आहे. याशिवाय संवेदनशील ठिकाणी नव्या सुरक्षा चौक्या उभारण्यात आल्या असून स्थानिक लोकांशी चौकशी करण्यात येत आहे. सीमेवरील प्रत्येक हालचालीवर सुरक्षा यंत्रणांचे बारकाईने लक्ष आहे. उरीसारख्या संवेदनशील भागात पुन्हा युद्धबंदीचे उल्लंघन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक प्रशासन सतर्क असून नागरिकांना अनावश्यक हालचाली टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

या घडामोडींचा थेट आढावा आमचे विशेष प्रतिनिधी जुनेद अख्तर यांनी घेतला. सुरक्षा यंत्रणा 24 तास सतर्क असून सीमावर्ती भागांतील प्रत्येक हालचाल नोंदवली जात आहे. पाकिस्तानकडून सुरू असलेल्या या कुरापतींमुळे भारतानेही प्रतिउत्तराची तयारी सुरू केल्याची माहिती संरक्षण सूत्रांनी दिली आहे. या परिस्थितीवर केंद्र सरकार आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी सातत्याने नजर ठेवून आहेत. 

हेही वाचा: महाराष्ट्रातील मृत पर्यटकांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत- देवेंद्र फडणवीसांची घोषणा

नेमकं काय घडलं? 
जम्मू-काश्मीरमधील सुंदरतेने नटलेले पहलगाम आता एका भयावह घटनेमुळे चर्चेत आले आहे. 22 एप्रिलला अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्याजवळील टेकड्यांवर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी आहेत. हल्ल्यानंतर संपूर्ण भागात भीतीचे सावट पसरले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार करण्या आधी धर्म विचारला गेला होता असं समोर आलं आहे. 

हल्ल्यानंतर पर्यटन व्यवसायाला फटका: 
 या हल्ल्याने काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे या आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये 80-90% बुकिंग रद्द करण्यात आले असल्याची माहिती श्रीनगरमधील हॉटेल स्नोलँड, बुलेव्रॅड येथे माध्यमांना संबोधित करताना देशभरातील राष्ट्रीय टूर ऑपरेटर्सने दिली आहे.


सम्बन्धित सामग्री