Auto Sector Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर वाहन खरेदीदारांच्या पदरी काहीशी निराशा पडली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठ्या सवलतींची अपेक्षा होती; मात्र, प्रत्यक्षात कारच्या किमती कमी होतील अशी कोणतीही थेट घोषणा या बजेटमध्ये करण्यात आलेली नाही किंवा सध्या तशी चिन्हेही दिसत नाहीत. अर्थसंकल्पापूर्वी ऑटोमोबाईल उद्योगाला इलेक्ट्रिक वाहनांवरील (EV) करात कपात किंवा नवीन सबसिडीची घोषणा होईल अशी दाट शक्यता वाटत होती. मात्र, तसे न झाल्यामुळे लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे.
ईव्ही आणि हायब्रीड वाहनांकडून असलेल्या अपेक्षांना धक्का
अर्थमंत्र्यांनी हायब्रीड किंवा इलेक्ट्रिक गाड्यांच्या करात कोणताही बदल केलेला नाही. तज्ज्ञांच्या मते, करात सवलत न मिळाल्याने नजीकच्या काळात कार आणि दुचाकींच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता धुसर आहे. जरी थेट कर कपात झाली नसली, तरी लिथियम-आयन सेलच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या भांडवली वस्तूंवरील मूळ सीमाशुल्कात दिलेली सवलत कायम ठेवण्यात आली आहे, ज्याचा अल्पसा फायदा भविष्यात ईव्ही बॅटरी उत्पादकांना होऊ शकतो.
बजेटनंतर कार स्वस्त होणार का?
सामान्य जनतेला यंदा कार आणि दुचाकी स्वस्त होतील अशी आशा होती, परंतु बजेटमध्ये तसे कोणतेही ठोस संकेत मिळालेले नाहीत. उद्योगातील जाणकारांच्या मते, कच्चा माल आणि उत्पादनाचा खर्च वाढत असल्याने गाड्यांच्या किमती कमी होण्याऐवजी स्थिर राहतील किंवा काही प्रमाणात वाढण्याचीच शक्यता अधिक आहे. ऑटो क्षेत्रासाठी कोणतीही 'मेगा' घोषणा न झाल्याने गुंतवणूकदारांमध्येही काहीशी अस्वस्थता पाहायला मिळाली.
हेही वाचा - Budget 2026: इन्कम टॅक्समध्ये बदल नाही, मग सामान्यांना काय मिळालं ? बजेटमधील 'हे' छुपे फायदे तुम्हाला माहिती असायलाच हवेत
काही काळापूर्वीच GST कपात
काही महिन्यांपूर्वीच निर्मला सीतारामन यांनी जीएसटीचे केवळ दोन स्लॅब ठेवले होते. यामध्ये वाहनांवरी जीएसटी कमी झाल्यामुळे किमती कमी झाल्या होत्या. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. यानंतर वाहन बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच, खरेदीतही वाढ दिसून आली होती. आता अर्थसंकल्पात पुन्हा एकदा काही सवलत मिळेल का, अशी एक शक्यता होती. मात्र, तीही आता मावळली आहे.
टाटा मोटर्सचा विक्रीत नवा विक्रम
एकीकडे बजेटमध्ये सवलतींची प्रतीक्षा असताना, दुसरीकडे भारतीय वाहन बाजारपेठेत टाटा मोटर्सने आपली पकड घट्ट केली आहे. जानेवारी 2026 मध्ये टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत वार्षिक आधारावर 47 टक्क्यांची प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात एकूण 71,066 वाहनांची विक्री केली, जी जानेवारी 2025 मध्ये 48,316 युनिट्स इतकी होती. विशेषतः देशांतर्गत बाजारपेठेत कंपनीने 70,222 वाहने विकली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 46 टक्के इतकी प्रभावी आहे.
हेही वाचा - Budget 2026 Schemes: महिला, शेतकरी अन् लघुउद्योग करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; यंदाच्या अर्थसंकल्पात 11 नव्या योजनांची घोषणा