IND vs UAE: अंडर-19 आशिया कपमध्ये भारतीय संघाने विजयी मोहीम शानदार शैलीत सुरू केली आहे. सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या रोमहर्षक शतकाच्या बळावर भारताने युएईचा 234 धावांनी मोठा पराभव करत स्पर्धेत आपले वर्चस्व दाखवून दिले. या विजयासह आता भारताचा पुढील महत्त्वाचा सामना 14 डिसेंबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होत आहे.
सूर्यवंशीचे 171 धावांचे धडाकेबाज शतक
पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने 6 गडी गमावून तब्बल 433 धावा जमविल्या. कर्णधार आयुष म्हात्रे स्वस्तात बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशीने एकहाती डाव सांभाळत अजबच फटकेबाजी सादर केली. सूर्यवंशीने 95 चेंडूत 14 षटकार आणि 9 चौकारांसह 171 धावा ठोकत युएईच्या गोलंदाजांचे कंबरडे मोडले. त्याचा खेळ पाहून तो द्विशतक गाठेल असे वाटत असतानाच तो बाद झाला.
हेही वाचा - India-Pakistan Match: भारत-पाक सामना पाहायचायं? फक्त 438 रुपयांत तिकीट! घरबसल्या बुकिंगची सोपी प्रक्रिया जाणून घ्या
जॉर्ज आणि मल्होत्राही चमकले
सूर्यवंशीनंतर आरोन जॉर्ज आणि विहान मल्होत्रानेही भक्कम खेळी करत भारताला प्रचंड धावसंख्या गाठून दिली. या तिघांच्या दमदार खेळीमुळे भारताने युएईला मोठं आव्हान दिलं.
हेही वाचा - Vinesh Phogat Comeback: विनेश फोगाटचा दमदार कमबॅक! पॅरिस ऑलिंपिकनंतर वर्षभराने करणार पुन्हा नवी सुरुवात
युएईचा संघर्ष व्यर्थ; भारताचा मोठा विजय
दरम्यान, 434 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युएई संघाने पूर्ण 50 षटके खेळली, मात्र भारतीय गोलंदाजांसमोर ते असहाय ठरले. युएईने 7 गडी गमावून 199 धावाच जमवल्या आणि भारताने हा सामना तब्बल 234 धावांनी जिंकला. भारत आणि पाकिस्तान या दोघांनीही आपापले पहिले सामने जिंकत प्रत्येकी 2 गुण मिळवले आहेत. पाकिस्तानचा नेट रन रेट अधिक असल्यामुळे ते गटात पहिल्या क्रमांकावर आहेत, तर भारत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. आता 14 डिसेंबर ला दुबईत होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.