राज्यातील कोरोना निर्बंधांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय!

राज्यात रोज आढळणारे कोरोना रुग्ण आणि सरासरी रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहेत. त्यामुळे दुसरी लाट ओसरल्याचं चित्र राज्यात निर्माण झालं आहेत. दुसरीकडे तिसऱ्या लाटेची टांगती तलवार देखील असल्यामुळे नेमके कोणते निर्बंध शिथिल करावेत आणि कोणत्या बाबींवर कठोर निर्णय घ्यावेत, यावर राज्य सरकारला मोठी कसरत करावी लागत आहे. यातच, आता राज्य सरकारने कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. वर्षा निवासस्थानी राज्यातील टास्क फोर्सची सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी राज्यातील उपहारगृहे, दुकानं आणि मनोरंजन पार्कविषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. तसेच, लहान मुलांसाठीच्या लसीकरणाबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सोमवारी टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील उपहारगृहे आणि दुकाने यांची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृह सुरू केली जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपहारगृहांची वेळ देखील वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. ही वेळ वाढवली जाणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. वेळ वाढवण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत.