Juhu Voter Boycott On BMC Election : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच, जुहूतील सुमारे 35 हजार नागरिकांनी लोकशाहीच्या या उत्सवावर बहिष्कार टाकण्याचे अस्त्र उपसले आहे. जुहू रुईया पार्क आणि कराची सोसायटीसह सुमारे 200 इमारतींमधील रहिवाशांनी 'घरे वाचवा' या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार जाहीर केला असून, सोसायट्यांच्या प्रवेशद्वारावर झळकणाऱ्या बॅनर्सनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
काय आहे बहिष्काराचे मुख्य कारण?
जुहू परिसरातील या टोकाच्या भूमिकेमागे अनेक वर्षांपासून रखडलेला पुनर्विकासाचा प्रश्न आहे. या परिसरात मिलिटरी रडार असल्यामुळे 'SR0150' या जुन्या कायद्याचा फटका रहिवाशांना बसत आहे. गेल्या 35 वर्षांपासून सुमारे 200 इमारती आणि दोन मोठ्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास रखडला आहे. येथील 35 हजार नागरिक सध्या जीव मुठीत धरून मोडकळीस आलेल्या घरात राहत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नेत्यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते, मात्र परिस्थिती 'जैसे थे' असल्याने नागरिक संतप्त आहेत.
हेही वाचा - Devendra Fadnavis : 'एकनाथ शिंदेंना वाळीत टाकलं...', देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंचं नाव घेत साधला निशाणा
बॅनरवरील मजकूर
दरम्यान, रहिवाशांनी लावलेल्या बॅनर्सवर लिहिले आहे की, 'आमची घरे उद्ध्वस्त करणाऱ्या कालबाह्य कायद्यांमुळे 35,000 नागरिकांवर अन्याय होत आहे. खोटी आश्वासने आता चालणार नाहीत. मतदान करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा!'
हेही वाचा - Navi Mumbai: निवडणुकीत पैसे वाटप? नवी मुंबईत मनसेने शिवसेनेला धरलं धारेवर; Video Viral
उमेदवारांचे धाबे दणाणले
नागरिकांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. प्रभाग क्रमांक 68 मधील मनसेचे उमेदवार संदेश देसाई यांनी प्रत्यक्ष सोसायट्यांमध्ये जाऊन रहिवाशांची भेट घेतली. या समस्येबाबत त्यांनी रहिवाशांना एक मोठे आश्वासन दिले आहे. निवडणुकीनंतर आम्ही या प्रश्नावर थेट उद्धव आणि राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंची संयुक्त भेट घालून देऊ. हा प्रश्न केंद्र सरकारशी निगडित असल्याने त्याचा प्रभावीपणे पाठपुरावा करून मार्गी लावू, अस आश्वासन देसाई यांनी येथील नागरिकांना दिलं.