मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात महायुती सरकारने धक्कादायक आकडेवारी उघड केली आहे. विदर्भ आणि मराठवाडा भागात दोन महिन्यांत 479 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शुक्रवारी राज्य विधानसभेत सरकारनेच ही धक्कादायक आकडेवारी सांगितली. याबाबत माहिती देताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी सांगितले की, मार्च आणि एप्रिल 2025 या दोन महिन्यांत मराठवाडा आणि विदर्भात एकूण 479 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही आकडेवारी राज्यातील शेतकऱ्यांच्या दुर्दशेचे भयानक चित्र अधोरेखित करते. मार्च महिन्यात विदर्भ आणि मराठवाडा भागात 250 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी 102 शेतकऱ्यांना सरकारने भरपाईसाठी पात्र मानले होते. त्याच वेळी, 62 शेतकऱ्यांना भरपाईसाठी अपात्र घोषित करण्यात आले होते. तर 77 प्रकरणांची चौकशी अजूनही सुरू आहे.
हेही वाचा - धक्कादायक! अलिबागमध्ये ऑफिस पार्टीत पुरुष सहकाऱ्याचा महिलेवर बलात्कार
दरम्यान, एप्रिलमध्ये आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 229 होती, त्यापैकी 74 शेतकरी भरपाईसाठी पात्र आढळले. 31 जणांना अपात्र मानले गेले आणि उर्वरित 124 प्रकरणांची चौकशी सुरू आहे, असंही मकरंद जाधव यांनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी सरकारवर निशाणा साधला होता. महाराष्ट्रात तीन महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, परंतु सरकार गप्प असल्याचा आरोपही त्यांनी केली. तसेच सरकारी व्यवस्था शेतकऱ्यांना मारत आहे, परंतु पंतप्रधान मोदी त्यांच्या जनसंपर्काचा तमाशा पाहत आहेत, अशी टीकाही राहुल गांधी यांनी यावेळी केली.
हेही वाचा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा
अमित मालवीय यांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर -
तथापी, भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी एक्सवर एक चार्ट शेअर केला, ज्यामध्ये असा दावा केला आहे की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अविभाजित) आणि काँग्रेस 15 वर्षे महाराष्ट्रात सत्तेत होते तेव्हा या काळात 55,928 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.