Ajit Pawar Plane Crash : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील क्रूमध्ये कॅप्टन सुमित कपूर, को -पायलट शांभवी पाठक, अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचेही निधन झाले. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी माळी कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला.
कठीण काळात पाठीशी राहण्याचा विश्वास
आदित्य ठाकरे यांनी पिंकी माळी यांच्या कुटुंबियांशी संवाद साधताना या कठीण प्रसंगात आपण आणि आपला पक्ष पूर्णपणे कुटुंबाच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला. भेटीदरम्यान त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांचीही विचारपूस केली आणि पिंकीला श्रद्धांजली वाहिली.
हेही वाचा - Praful Patel : दिल्लीत खलबतं! प्रफुल पटेलांनी घेतली मोदी-शाहांची भेट; राष्ट्रवादीच्या 'राष्ट्रीय अध्यक्षपदी' कोण?
राजकीय वर्तुळातून सांत्वनाचा ओघ
विमान अपघाताच्या या घटनेने संपूर्ण राज्याला धक्का बसला आहे. आदित्य ठाकरे यांच्या या भेटीमुळे राजकीय मतभेद बाजूला सारून माणुसकीचे दर्शन घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या दुःखद घटनेनंतर अनेक मोठ्या नेत्यांनी माळी कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे. तथापी, अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.