Ajit Pawar Dashkriya Vidhi : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरच्या धार्मिक विधींबाबत त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. परंपरेनुसार होणारा 'दशक्रिया विधी' किंवा 13 व्या दिवसाचा कोणताही सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून अजितदादांच्या दशक्रिया विधींबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
धार्मिक विधींबाबत कौटुंबिक निर्णय
श्रीनिवास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या अस्थि विसर्जनाच्या वेळीच कुटुंबाने सर्व आवश्यक धार्मिक विधी पूर्ण केले आहेत. त्यामुळे 6 फेब्रुवारी रोजी होणारा दहाव्या दिवसाचा विधी किंवा 113 व्या दिवसाचे उत्तरकार्य सार्वजनिकरीत्या केले जाणार नाही. हा निर्णय पवार कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा करूनच घेण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयावर सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार यांच्याकडून अद्याप कोणतीही स्वतंत्र प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
हेही वाचा - NCP Politics : दिल्लीला जाणं रद्द करून पवारांची पुण्याकडे धाव! राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच; अजितदादांनंतर कोणाकडे धुरा?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाचा पेच
एककीडे कुटुंब निधनाच्या धक्क्यातून सावरत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) नेतृत्वाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. अजितदादांच्या रिक्त जागी पक्षाची धुरा कोणाकडे सोपवायची, यावरून खल सुरू आहे. पक्षातील बहुतांश आमदार आणि कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी लावून धरली आहे.
प्रफुल्ल पटेल यांची भूमिका
याच दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांची अध्यक्षपदी निवड झाल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. मात्र, पटेल यांनी स्वतःच या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. अद्याप कोणत्याही नावावर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पक्षाचे भविष्य आणि कुटुंबाचा वैयक्तिक निर्णय या दोन्ही गोष्टी सध्या महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.