Rohit Pawar: उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीत आता एक नवे आणि धक्कादायक वळण समोर आले आहे. आमदार रोहित पवार यांनी आज घेतलेल्या चौथ्या पत्रकार परिषदेत या प्रकरणाभोवती असलेल्या संशयाचे जाळे अधिक गडद केले आहे. अपघातापूर्वी बारामती विमानतळाची 'रेकी' झाली होती का? असा खळबळजनक सवाल उपस्थित करत त्यांनी थेट चौकशीची मागणी केली आहे.
तपास अहवालातील 'भेदभावा'वर बोट
रोहित पवार यांनी एआयबीच्या (AAIB) अहवालातील त्रुटींवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, 'इतर कोणत्याही विमान अपघाताच्या अहवालात तपास अधिकाऱ्यांची नावे असतात, मग अजितदादांच्या अपघात अहवालातून ती नावे का वगळली? कागदपत्रांत हेराफेरी करण्यासाठीच ही गोपनीयता पाळली गेली का?' असा सवालही त्यांनी केला आहे. 'काही सूत्रांच्या मते अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली होती. आम्हाला याची खात्रीशीर माहिती नसली तरी, या अँगलने सखोल चौकशी होणे अनिवार्य आहे,' असे रोहित पवार यांनी नमूद केले.
'त्यागी समिती'च्या नियमांचे उल्लंघन?
विमान अपघाताच्या तांत्रिक बाबींवर बोट ठेवताना रोहित पवारांनी काही गंभीर आरोप केले. 'कमी व्हिजिबिलिटी असतानाही विमानाला टेक-ऑफ आणि लँडिंगची परवानगी कशी मिळाली? 'त्यागी समिती'च्या नियमांनुसार अशा परिस्थितीत लँडिंग प्रतिबंधित असतानाही हा धोका का पत्करला गेला?' असा सवालही त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणामागे 'ॲरो' (AERO) नावाच्या ग्रुपमधील नागरी उड्डाण विभागाचे अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा संशय पवारांनी व्यक्त केला आहे. या ग्रुपमधील सर्व संबंधित व्यक्तींवर तात्काळ एफआयआर (FIR) दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा - Ajit Pawar Plane Crash: 'कप्तानने ठोक दिया...'; भर पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप ऐकवून रोहित पवारांचा खळबळजनक दावा
विमान कंपनीवर निशाणा
पूर्वी वापरल्या जाणाऱ्या विमानांच्या सुरक्षेबाबत आम्ही जे प्रश्न उपस्थित केले होते, ते आता खरे ठरत आहेत, असा दावाही त्यांनी केला. विमान कंपन्या आणि तपास यंत्रणा आपली जबाबदारी झटकत असून गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा कोणाचा आहे, हे स्पष्ट होणे गरजेचे असल्याचे रोहित पवार यांनी ठामपणे सांगितले.