Sanjay Raut on Rajya Sabha Elections: राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये (MVA) जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना मित्रपक्षांना सूचक इशारा दिला आहे. राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीत जागांच्या वाटपावरून चर्चा होणे स्वाभाविक आहे, परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेचा आवाज राज्यसभेत असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक पक्षाची आपली इच्छा असते, पण राजकारण आणि आकड्यांचे गणित पाहता शिवसेनेचा दावा प्रबळ आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शरद पवारांच्या एन्ट्रीची चर्चा आणि 'मनाचे श्लोक'
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार हे स्वतः राज्यसभेसाठी इच्छुक असल्याच्या चर्चांवर राऊत यांनी मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले की, "शरद पवार कधी एन्ट्री घेतील हे सांगणे कठीण आहे, पण सध्या ज्या चर्चा सुरू आहेत ते केवळ 'मनाचे श्लोक' आहेत." राऊत यांच्या मते, शरद पवार, जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यात या विषयावर चर्चा झाली असली तरी, अंतिम निर्णयापर्यंत पोहोचणे अद्याप बाकी आहे. राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे आहे, मात्र शिवसेनेचा प्रतिनिधी तिथे असणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
हेही वाचा - Maharashtra Local Body Election 2026: का रेंगाळल्या 19 जिल्हा परिषदांच्या निवडणुका? जाणून घ्या सर्वोच्च न्यायालयाचा सविस्तर निर्णय
शिवसेना मोठा भाऊ; एका जागेसाठी ठाम दावा
संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील पक्षीय बलाबल स्पष्ट करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा या तिन्ही पक्षांतील सर्वात मोठा पक्ष असल्याचे सांगितले. "आम्हाला राज्यसभेत आमचे किमान 2 प्रतिनिधी असावे असे वाटते. सध्या राज्यसभेत शिवसेनेचा आवाज गायब आहे, तो पुन्हा बुलंद करण्यासाठी आम्हाला त्या एका जागेची गरज आहे," असे राऊत म्हणाले. महाविकास आघाडीत आम्ही मोठा पक्ष असल्याने त्या जागेवर आमचा नैसर्गिक दावा असल्याचे सांगत त्यांनी चेंडू आता मित्रपक्षांच्या कोर्टात टाकला आहे.