BJP Vs UBT Rada : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान इचलकरंजी शहरात राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पैसे वाटपाच्या संशयावरून सुरू झालेल्या या वादामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वादाचे नेमके कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मतदानाच्या दिवशी भाजप उमेदवाराने आपल्या समर्थकांना आणि मतदारांना एका ठिकाणी चहापानासाठी एकत्र बोलावले होते. मात्र, या चहापानाच्या आड मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा दाट संशय ठाकरे गटाच्या उमेदवाराला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आला. याच संशयावरून ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी थेट घटनास्थळी धाव घेत भाजप कार्यकर्त्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली.
हेही वाचा - Maharashtra Civic Body Elections 2026 : दुपारनंतर मतदारांचा उत्साह वाढला; पहा जिल्हानिहाय मतदानाची आकडेवारी
हाणामारी आणि गोंधळ
सुरुवातीला दोन्ही गटांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली, परंतु काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी परिसरात मोठा गोंधळ घालत भाजप उमेदवारावर पैसे वाटपाचा गंभीर आरोप केला. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोळा झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. 'लोकशाहीच्या उत्सवात पैशांचा गैरवापर होत आहे,' असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला, तर 'आम्ही केवळ चहापानासाठी जमलो होतो, आमची बदनामी केली जात आहे,' असा प्रतिदावा भाजपकडून करण्यात आला.
हेही वाचा - Nashik Election 2026 : नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, बडगुजरांच्या कार्यालयाबाहेर पैसे वाटपाच्या आरोपावरून राडा; नेमकं काय घडलं?
पोलिसांची मध्यस्थी आणि परिस्थितीवर नियंत्रण
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने प्रभाग 5 मध्ये धाव घेतली. वाढता तणाव पाहता पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून वाचली. सध्या या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.