Mantralaya Corruption: मंत्रालयातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. निधी मंजूर करण्याच्या बदल्यात लाखो रुपयांची लाच मागणाऱ्या अर्थ व नियोजन विभागाच्या एका बड्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. मंत्रालयातील या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
निधी मंजुरीसाठी 6 लाख 37 हजारांची लाच
प्राप्त माहितीनुसार, ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अर्थ विभागाचा कक्ष अधिकारी विलास लाड याने तक्रारदाराकडे मोठ्या रकमेची मागणी केली होती. शासकीय कामात अडवणूक करून लाच मागितली जात असल्याची तक्रार 'एसीबी'कडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत पथकाने नवी मुंबईतील खारघर परिसरात सापळा रचला आणि 6 लाख 37 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाड याला बेड्या ठोकल्या.
मंत्रालयात लाचखोरांचे धाबे दणाणले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनात पारदर्शकता आणण्यावर भर दिल्यानंतर, एसीबीने थेट मंत्रालयातील दालनांपर्यंत धडक दिली आहे. मंत्रालयातील भ्रष्टाचाराचे हे सलग दुसरे मोठे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. "भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही," हा मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश या कारवाईतून अधोरेखित झाला आहे. या धडक कारवाईमुळे मंत्रालयात बसून 'फायली' अडवणाऱ्या इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मंत्री कार्यालयातील 'त्या' अटकेची पुन्हा चर्चा
काही दिवसांपूर्वीच अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला 50 हजारांची लाच घेताना मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून अटक करण्यात आली होती. खुद्द मंत्र्यांच्या केबिनमध्ये घुसून केलेल्या त्या कारवाईमुळे प्रशासनाची मोठी नाचक्की झाली होती. आता पुन्हा एकदा अर्थ विभागातील कक्ष अधिकाऱ्याला अटक झाल्याने मंत्रालयातील लाचखोरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा - Crime News: बापरे! मॅरेज हॉलवर पोलिसांचा छापा; तब्बल 80 तरुण-तरुणी नको त्या अवस्थेत, त्यात 31 अल्पवयीन…
पारदर्शकतेसाठी मोहीम अधिक तीव्र होणार
प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांची अडवणूक थांबवण्यासाठी ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. फाईल क्लिअर करण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर आता 'एसीबी'ची करडी नजर असणार आहे.