नवापूर : तालुक्यातील 116 ग्रामपंचायतींच्या हद्दीत बांधण्यात आलेल्या चर्चांच्या बांधकामांबाबत माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत 9 डिसेंबर 2024 रोजी माहितीची मागणी करण्यात आली होती. मात्र, संबंधित ग्रामविकास अधिकारी तथा ग्रामसेवकांनी आजतागायत ही माहिती प्रदान केलेली नाही. या विलंबामुळे, भांगरपाडा गावचे आदिवासी संस्कृती रक्षक श्री. उमेश मंजी गावीत यांनी 12 फेब्रुवारी 2025 पासून तहसील कार्यालय, नवापूर समोरील मोकळ्या जागेत शांततापूर्ण धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा आठवा दिवस आहे, आणि जर लवकरच माहिती प्रदान करण्यात आली नसल्याने 17 फेब्रुवारी 2025 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
उमेश मंजी गावीत यांच्या प्रमुख मागण्या:
ग्रामपंचायतीच्या गावठाण जमिनीवर बांधलेल्या चर्चांच्या बांधकामांची सविस्तर माहिती सही-शिक्क्यासह मिळावी.
सदर बांधकामांसाठी ग्रामसभेचा ठराव मंजूर झाल्याची सविस्तर माहिती मिळावी.
पक्क्या बांधकामांसाठी नमुना क्रमांक 8-अ उतारा प्रदान करण्यात यावा.
वास्तुतज्ज्ञाकडून तयार केलेला नकाशा आणि नगर रचना (T.P.) परवानगीची छायांकित प्रत मिळावी.
नगर रचना कार्यालय, नंदुरबार यांनी बांधकामाबाबत दिलेल्या नियम व अटींची प्रत तसेच ना-हरकत दाखल्याबाबत सविस्तर माहिती मिळावी.
खाजगी शेतजमिनीवर बांधलेल्या चर्चांसाठी शासनाचे बिनशेती (N.A.) आदेशाची छायांकित प्रत मिळावी.
जमीन मालकाने दिलेल्या संमतीबाबतची सविस्तर माहिती मिळावी.
नगर रचना कार्यालय, नंदुरबार यांनी बांधकामासाठी वास्तुतज्ज्ञाचा नकाशा आणि ना-हरकत दाखल्याची प्रत सही-शिक्क्यासह मिळावी.
संबंधित ग्रामपंचायतींनी माहिती अधिकार अधिनियमांतर्गत माहिती प्रदान करणे बंधनकारक आहे. माहिती न मिळाल्यास, उच्च अधिकाऱ्यांकडे अपील दाखल करून किंवा महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाकडे तक्रार करून आवश्यक ती माहिती मिळवता येऊ शकते.