बारामती: काल सकाळी झालेल्या त्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या विमान अपघाताने केवळ बारामतीच नव्हे, तर अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आपल्या रोखठोक शैलीने आणि अफाट कार्यक्षमतेने राजकारणात दबदबा निर्माण करणारे अजितदादा आज नाहीत, यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आज जनसागराचा महापूर लोटला आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि ओठांवर फक्त 'दादां'च्या आठवणी.
बड्या नेत्यांची उपस्थिती
अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी बारामतीत दाखल झाली आहे. राजकीय मतभेद विसरून आज प्रत्येक नेता एका मोठ्या भावाला गमावल्याच्या दुःखात बुडाला आहे.
हेही वाचा: Ajit Pawar Memories: गुलाबी जॅकेट, नवी स्टाईल; अजितदादांच्या 'या' लुकने सगळ्यांनाच भुरळ घातली
"मी माझं सर्वस्व गमावलं..." : चालकाचा काळजाला भिडणारा आक्रोश
या दुर्घटनेच्या जखमा जितक्या खोल आहेत, तितकीच वेदनादायी आहे अजित पवार यांचे चालक श्यामराव नारायण मनवे यांची शोककळा. गेली 25 वर्षे सावलीसारखे दादांसोबत असणारे 71 वर्षीय श्यामराव आज पूर्णपणे कोलमडून गेले आहेत.
अश्रू पुसत त्यांनी सांगितलं, "दादा दैवत होते. मंगळवारी रात्री मुंबईत मीटिंग संपल्यावर मी त्यांना म्हणालो होतो, 'दादा, आपण गाडीनेच बारामतीला जाऊया.' पण दादांनी त्यांच्या खास शैलीत सांगितलं, 'तू पुण्याला ये, मी सभा आटोपून विमानाने येतो.' मला वाटलं नव्हत की हा आमचा शेवटचा संवाद ठरेल? आज मी माझं सर्वस्व गमावलं आहे. माझे दैवत आज मला कायमचा सोडून गेले."
एक न भरून निघणारी पोकळी
अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि राजकीय पटलावर अशी पोकळी निर्माण झाली आहे, जी कदाचित कधीच भरून निघणार नाही. पहाटे पाच वाजल्यापासून कामाला सुरुवात करणारा हा शिस्तबद्ध नेता, लोकांच्या प्रश्नांसाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरणारा लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांसाठी सदैव पाठीशी उभा राहणारा आधारवड आज कायमचा शांत झाला आहे.
हेही वाचा: Pinky Mali: शेवटचा फोन आणि 'तो' निरोप... अजित पवारांच्या विमानातील फ्लाईट अटेंडंट पिंकी माळीचं हे स्वप्न अपूर्णच राहिलं