मुंबई: बुधवारी, 28 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, हा मृत्यू नेमका अपघाती होता की घातपात, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी या दुर्घटनेमागे षड्यंत्र असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
यामध्येच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप करत हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा केला आहे. संजय राऊत यांनी म्हटले आहे की, सिंचन घोटाळा प्रकरणावरून अजित पवार यांना भाजपकडून धमक्या दिल्या जात होत्या. “सिंचन घोटाळ्याची फाईल बाहेर काढू,” अशी धमकी भाजपकडून देण्यात आली होती, असा आरोपही त्यांनी केला. भाजप आणि अजित पवार यांच्यातील वाढता वाद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) सोबत संभाव्य एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवरच हा घातपात घडवून आणण्यात आल्याचा संजय राऊत यांनी व्यक्त केला.
संजय राऊत यांनी विमानातील प्रवाशांच्या संख्येवरही प्रश्न उपस्थित केला. विमानात एकूण सहा जण प्रवास करत होते, मात्र घटनास्थळी पाच मृतदेहच सापडले. मग सहाव्या व्यक्तीचा मृतदेह कुठे आहे, असा सवाल त्यांनी केला.शिवाय या घटनेवरून मला जस्टीस लोयांची ही आठवण आल्याचे राऊत म्हणाले. यापूर्वी हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही उपस्थित केला होता.
हेही वाचा: Raghuram Rajan: रघुराम राजन यांनी विचारला सरकारला जाब; 'या' चुका भारताला नडणार? म्हणाले, 'AI क्षेत्रात गुंतवणूक करताना...'
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनीही या मुद्द्यावर सोशल मीडियावर पोस्ट करत सहा प्रवासी असताना पाच मृतदेह कसे काय सापडले, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी संजय राऊत यांच्या भूमिकेला समर्थन देत सखोल आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. राज्यातील सर्वच नागरिकांना हा प्रश्न पडला आहे असं ठोंबरे म्हणाल्या. या घटनेमागील सत्य समोर हे आलेच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी या प्रकरणावर त्यांची भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, “हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचे सत्य समोर आले पाहिजे. सध्या आम्ही संजय राऊत काय म्हणत आहेत, याकडे दुर्लक्ष करत आहोत. अजित पवार यांच्या निधनामुळे आम्हाला मोठा धक्का बसला आहे. मात्र या मृत्यूमागील नेमके कारण संपूर्णपणे स्पष्ट होणे अत्यंत आवश्यक आहे.”
एकंदर पाहता, अजित पवार यांचा अकस्मित मृत्यू हा अपघात होता की घातपात, यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे.
या दुर्घटनेतील विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून, डीजीसीए आणि सीआयडीकडून पुढील चौकशी सुरू आहे. या चौकशीतून अंतिम सत्य लवकरच समोर येईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा: Sunetra Pawar: उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक