Ajit Pawar Death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. हा भीषण अपघात डोळ्यांसमोर घडताना पाहणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने या घटनेचा अंगावर काटा आणणारा थरार सांगितला आहे. "ज्या सीटवर अजितदादा बसले होते, ती सीट जळून खाक झाली होती," असं या अधिकाऱ्याने सांगितलं.
नेमका घटनाक्रम काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळाच्या परिसरात पोहोचले तेव्हा वातावरणात प्रचंड धुके होते. प्रत्यक्षदर्शी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "विमानाने सुरुवातीला लँडिंगसाठी आकाशात घिरट्या घातल्या. वैमानिक धावपट्टीचा (Runway) अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होता, मात्र धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी होती. विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी धावपट्टीपासून सुमारे 50 किलोमीटर दूर असलेल्या एका मोकळ्या जागेकडे भरकटले."
हेही वाचा - Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या जाण्याने धनंजय मुंडेंना दुःख अनावर; प्रवासादरम्यान फोनवर हुंदका दाटला, म्हणाले 'माझा आधार...'
नजरेसमोर विमानाचा स्फोट
वैमानिकाला धावपट्टीचा अचूक अंदाज न आल्याने विमान वेगाने जमिनीच्या दिशेने झेपावले. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, "विमान अत्यंत वेगाने खाली आले आणि जमिनीला धडकताच एक मोठा भीषण स्फोट झाला. काही क्षणांतच विमानाने पेट घेतला. आम्ही धावत घटनास्थळी पोहोचलो, पण आगीचा लोळ इतका मोठा होता की जवळ जाणेही कठीण होते."
धुके ठरले काळ
प्राथमिक अंदाजानुसार, खराब हवामान आणि दाट धुके यामुळे हा घात झाला आहे. वैमानिकाला नेमका धावपट्टीचा रस्ता सापडला नाही आणि धावपट्टीपासून दूरच विमान कोसळले. या अपघाताच्या वृत्ताने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, तांत्रिक बिघाड की हवामानाचा अंदाज चुकल्यामुळे ही दुर्घटना घडली, याचा सखोल तपास आता यंत्रणांकडून केला जात आहे.