सिंधुदुर्ग : कोकणचा अभिमान असलेला आणि जागतिक ख्याती मिळवलेला हापूस आंबा यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणतोय. बाजारात आंब्याची झपाट्याने वाढलेली आवक आणि निर्यातीतील मर्यादा यामुळे दरांमध्ये तब्बल 50 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. गोडसर चव असला तरी यंदा हापूसचा बाजार आंबट बनला आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असताना, ग्राहकांना मात्र दर्जेदार आंबा स्वस्तात मिळत असल्याने समाधान वाटते आहे.
सिंधुदुर्गात सध्या 4 ते 5 डझनांच्या हापूस पेटीला फक्त दीड ते दोन हजार रुपये दर मिळतो आहे. मागील वर्षी याच प्रमाणाच्या पेटीला सुमारे 4000 रुपये मिळत होते. इतक्या मोठ्या फरकामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळत नाहीये.
स्थानिक बाजारात तर हापूसचे दर थेट सामान्य माणसाच्या आवाक्यात आले आहेत. एक डझन हापूस अवघ्या 300 ते 500 रुपयांत मिळतो आहे. ज्या आंब्याची चव लाखमोलाची, तो आत्ता शेकड्यांमध्ये विकला जातोय.
हेही वाचा :देशात सर्वाधिक, जगात चौथं; चंद्रपूरचा पारा 45 डिग्री पार
हंगामाची गती झाली मंद
यंदा हापूसचा हंगाम जानेवारीच्या अखेरीपासूनच सुरू झाला, पण सुरुवातीला फळांची संख्या कमी होती. नंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये अचानक मोठी आवक झाली आणि दर कोसळले. दर वाढतील या आशेवर बसलेले शेतकरी आता उत्पादन खर्च भरून काढायलाही हवालदिल झाले आहेत.
पॅकेजिंग, वाहतूक खर्च वाढला ;दर मात्र घसरले
हापूसची विक्री ही फक्त चव नाही, तर आकर्षक पॅकेजिंग, चांगली वाहतूक व्यवस्था आणि वेळेवर पोहोचण्यावरही अवलंबून असते. पण यंदा या सगळ्याचा खर्च वाढलेला असताना, उत्पन्न मात्र घटले आहे. मुंबई, पुणे, नाशिकसारख्या मोठ्या शहरांमध्ये आंबा पोहचवणंही आता तोट्याचं ठरतंय.
शासनाकडून हस्तक्षेपाची गरज: अन्यथा हंगाम अयशस्वी
हापूस निर्यातीवरही यंदा परिणाम जाणवतोय. काही देशांमधून मागणी कमी झाल्याने निर्यातदारही मोठ्या प्रमाणावर खरेदी करत नाहीत. त्यामुळे संपूर्ण भार स्थानिक बाजारावर आला आहे. शेतकऱ्यांनी शासनाने यामध्ये हस्तक्षेप करून हमी दर द्यावा, अशा मागण्या लावून धरल्या आहेत.