Anjali Damania on Parth Pawar: दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'पवार विरुद्ध दमानिया' असा जुना संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन तीन दिवस उलटत नाही, तोच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. "जमीन घोटाळ्याची चौकशी सुरू असताना पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवणे चुकीचे आहे," असे म्हणत त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे.
अंजली दमानियांच्या 2 प्रमुख मागण्या
दमानिया यांनी आपल्या 'X' (ट्विटर) पोस्टद्वारे खळबळ उडवून दिली असून सरकारसमोर दोन अटी ठेवल्या आहेत. यातील पहिली अट म्हणजे पुण्यातील कथित भूखंड घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांवर त्वरित गुन्हा दाखल करावा. तसेच दुसरी अट म्हणजे या प्रकरणाशी संबंधित खारगे आयोगाचा अहवाल तातडीने जनतेसमोर जाहीर करावा. 'अजितदादांच्या निधनानंतर शपथविधी उरकण्याची घाई झाली, पण आता 'बिझनेस ॲज युज्युअल' असेल तर गुन्ह्यांची चौकशीही थांबता कामा नये,' असा टोला दमानिया यांनी लगावला आहे.
हेही वाचा - Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमान अपघातातील पायलट जिवंत ? पत्नीच्या इन्स्टाग्राम पोस्टने खळबळ
नेमका काय आहे 1800 कोटींचा घोटाळा?
पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील मुंढवा-कोरेगाव पार्क भागातील एका मौल्यवान भूखंडाबाबत गंभीर आरोप आहेत. 1800 कोटी रुपये बाजारमूल्य असलेला भूखंड अवघ्या 300 कोटींत 'अमेडिया' कंपनीने खरेदी केल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणात इतर लोकांवर गुन्हे दाखल झाले असले, तरी मुख्य सूत्रधार असलेल्या पार्थ पवारांना का वाचवले जात आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
धनंजय मुंडेंवर 'संधीसाधू' म्हणून प्रहार
दरम्यान, दमानिया यांनी केवळ पवारांनाच नाही, तर त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांनाही लक्ष्य केले आहे. सुनेत्रा पवारांच्या अवतीभोवती फिरणाऱ्या धनंजय मुंडे यांचा उल्लेख करत त्यांनी 'परत येण्यासाठी चाललेली तडफड आणि संधीसाधू वृत्ती,' अशा शब्दांत मुंडेंवर बोचरी टीका केली आहे.